Tuesday, May 24, 2011

सतीची प्रथा आणि अकबर

भारतातील सतीची जुलमी प्रथा बंद करण्याचे श्रेय लॉर्ड बेंटिंक आणि राजा राममोहन रॉय यांना दिले जाते परंतु त्याआधी हजारो वर्षे चालत आलेल्या या प्रथेला कोणाही कनवाळू माणसाने विरोध केला नाही हे पटणे थोडे कठीण वाटते. शिवाजी महाराजांनी जिजाऊंना सती जाण्यापासून रोखल्याचे, तसेच मल्हारराव होळकरांनी आपल्या सुनेला, अहिल्येला सती जाण्यापासून रोखल्याचे वाचायला मिळते परंतु तसा कायदा करणे किंवा इतरांच्या स्त्रियांची या जुलमातून मुक्तता करण्याचे प्रयत्न झालेले दिसत नाहीत. या पार्श्वभूमीवर अकबराबद्दल जे वाचनात आले ते येथे देते.

मध्यमवयाकडे झुकणार्‍या अकबराला सुफी पंथ, पारशी आणि जैन धर्मांविषयी गोडी लागली होती. हिंदू आणि ख्रिश्चन धर्माकडेही त्याचा ओढा वाढला होता. अनेक धर्मीयांशी होणार्‍या वादविवाद चर्चांतून त्याच्यात हळूहळू बदल होत गेले. त्यातील काही बदल म्हणजे त्याने मांसाहार सोडला. राज्यातील शिकारींवर निर्बंध आणले, जनावरांची कत्तल करण्यावर निर्बंध आणले. ते इतके की वर्षातील अर्धे दिवस पाळीव जनावरांची (गाई-बैल, म्हशी, घोडे इ.) कत्तल होत नसे.

खालील गोष्ट घडली तेव्हा अकबराने चाळीशी पार केलेली होती. एके दिवशी अकबर आपल्या राणीवशात (बहुधा हिंदू राणीच्या) झोपला असता सकाळच्या प्रहरी बायकांची कुजबूज त्याच्या कानी पडली. त्याने उठून चौकशी केली असता कळले की राजा भगवानदासाच्या कुटुंबातील एक स्त्री सती जात आहे. अंबेरचे राजा भगवानदास हे मोठे प्रस्थ होते. त्याच्या बहिणीचा विवाह खुद्द अकबराशी झाला होता आणि त्याचा मुलगा मानसिंग अकबराचा प्रमुख सेनापती होता. त्यांच्या कुटुंबात सती जात आहे असे कळल्यावर राणीवशात चलबिचल होणे साहजिक होते. अधिक चौकशी करता अकबराला कळले की -
जयमल नावाचा राजा भगवानदासाचा एक भाऊ होता. त्याची रवानगी बंगाल, बिहार, ओरिसाच्या क्षेत्रात लढाईसाठी झाली होती परंतु भर उन्हाळ्यात घोडेस्वारी करताना तो बिहारमध्ये उष्माघाताने आजारी पडला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. त्याची बायको राव उदयसिंग या मारवाडच्या राजाची मुलगी होती. तिच्यावर सती जाण्यासाठी दडपण येत होते. सती जाण्यास तिची तयारी नव्हती परंतु घरच्यांनी तिला तिच्या संमतीशिवायही सती जाण्यास भाग पाडण्याचा निर्णय घेतला होता. यात खुद्द तिच्या मुलाचा समावेश होता.

अकबराच्या कानावर ही गोष्ट गेल्यावर तो तिरमिरीने उठला आणि तडक घोड्यावर बसून सतीच्या चितेपाशी पोहोचला. बादशहा असा तिरमिरीने निघाला ही खबर कळताच त्याचे अंगरक्षकही घाईघाईने त्याच्या मागोमाग गेले. सुदैवाने, अकबर वेळेत पोहोचला आणि बादशहा आणि त्याच्यामागे आलेले सैनिक पाहून सतीची मिरवणूक थांबली. जबरदस्तीने त्या बाईला सती जाण्यास भाग पाडणार्‍यांची डोकी उडवावी अशी इच्छा झाल्याचे अकबराने नंतर व्यक्त केले परंतु प्रत्यक्षात तसे केले नाही. मिरवणूकीतील सर्वांना अटक मात्र झाली आणि काही काळ बंदीवास दिल्यानंतर त्यांची सुटका झाली.

या घटनेच्यावेळी राज्यात सती जाऊ नये असा पूर्वीच केलेला कायदा होता की या घटनेनंतर तसा कायदा करण्याचा निर्णय अकबराने घेतला ते नेमके कळत नाही परंतु सतीप्रथेवर बंदी आणण्याचा कडक कायदा करणे त्याला शक्य झाले नसावे. याचे कारण पदरी असणार्‍या प्रमुख राजपूत सरदारांना नाराज करणे त्याला शक्य नसावे. तरीही, 'केवळ त्या बाईची संमती असेल तरच ती सती जाऊ शकते परंतु तिच्या संमतीविना तिला सती जाण्यास प्रवृत्त करू नये आणि तसे करणार्‍यांवर कारवाई केली जाऊ शकते' असा कायदा त्याने केला.

अबु'ल फझलच्या म्हणण्याप्रमाणे अकबराच्या राज्यात कोतवालाची जबाबदारी ही "नागरक" या हिंदुग्रंथातील मौर्यकालीन कोतवालाप्रमाणेच होती. त्यात त्याने ज्या इतर कायद्यांची भर केली त्यात सतीविरोधी कायदाही होता. त्यानुसार, कोतवालाने गावात हेर नेमायचे आणि या हेरांनी गावात काय चालते त्याची इत्यंभूत माहिती परत आणायची. यात एखाद्या बाईला तिच्या संमतीविना सती दिले जात असल्यास ती कृती थांबवायचे आदेश होते. जर स्त्री स्वखुशीने सती जात असेल तर त्या घटनेत विलंब आणण्याचे आणि त्या स्त्रीचे मन वळवायचे आदेश होते. वेळ गेला की त्या स्त्रीचा दु:खावेग आवरून ती मृत्यूपासून परावृत्त होईल असा अंदाज त्यामागे होता.

अकबराचा कायदा किती सफल झाला याची कल्पना नाही पण त्याच्या पश्चात जहांगीर, शाहजहान आणि औरंगजेब यांनीही या कायदा तसाच ठेवला. किंबहुना, औरंगजेबाच्या राज्यात सती प्रथेवर पूर्णतः बंदी होती. इतर कायद्यांमध्ये अकबराने विधवांना पुर्नविवाह करण्याची संमती दिली होती आणि विवाहानंतर गर्भदानाचे वय किमान १२ असावे अशी सक्तीही केली होती.

सतीच्या प्रथेविरोधी कायदा करणारी अकबर ही बहुधा पहिली व्यक्ती असावी.

याच पार्श्वभूमीवर यापूर्वी १५६८मध्ये अकबराच्या स्वारीत चित्तौडला झालेला ३०० स्त्रियांच्या जौहाराची आठवण होणे साहजिक आहे. तो पाहून अकबराचे मन हेलावल्याचे संदर्भ पाहण्यास मिळत नाहीत. परंतु सम्राट अशोकाप्रमाणेचत्यावेळी अकबराला उपरती आणि साक्षात्कार झालेले नव्हते हे ही खरे.

संदर्भः अकबर द ग्रेट मोगल - विन्सेंट स्मिथ.

Monday, May 02, 2011

अंश ईश्वराचा

मानव रानटी अवस्थेत असतानाही त्याला एक गोष्ट नेमकी आणि लवकरच कळून आली असावी ती म्हणजे एक एकटे राहण्यापेक्षा टोळी बनवून राहणे फायद्याचे आहे. ही गोष्ट त्याला रानटी अवस्थेत असताना कळली की कपिवस्थेत याबद्दल विशेष माहिती नाही पण त्याचे नेमके फायदे तोटे मनुष्यावस्थेत कळले असे मानू. आपला गट निर्माण केला की एकत्रितरीत्या शत्रूवर चाल करून जाणे सोपे पडते, स्वतःचे आणि आप्तजनांचे रक्षण करता येते, शिकार करणे सोपे जाते या गोष्टी त्याच्या ध्यानात आल्या असाव्या. टोळी जसजशी मोठी होत गेली तसतसे टोळीत अंतर्गत कटकटीही निर्माण झाल्या असाव्यात आणि मग त्या टोळीला शिस्त लावण्यासाठी, तिच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी टोळीतील शक्तीने आणि बुद्धिमत्तेने श्रेष्ठ असणाऱ्या व्यक्तीकडे त्या टोळीचे नेतृत्व आले असावे. नगरे स्थापन झाल्यावर आणि टोळ्यांची व्याप्ती वाढल्यावर याच टोळीप्रमुखाचा राजा झाला.








आयसीसच्या रूपातील क्लिओपात्रा

टोळीची किंवा राज्याची व्यवस्था राखतानाच राजाला स्वतःच्या भवितव्याचा विचार करणे, आपले पद राखून ठेवणे आणि स्वतःला सुरक्षित ठेवणेही आवश्यक होते. या कामी केवळ शक्तीचा उपयोग नव्हता तर युक्तीचा उपयोगही करणे आवश्यक होते. राजाच्या मागे उभे राहणारे बळकट वीर, सेनापती, अमात्य, मंत्री, इतर हुशार सल्लागार आणि सामान्य प्रजाजन या सर्वांत एकी राखण्यास आवश्यक असणारा गुण म्हणजे राजनिष्ठा. एखाद्या व्यक्तीविषयी अपार निष्ठा बाळगण्यासाठी त्या व्यक्तीला एकतर कर्तृत्वाने अतिशय मोठे होण्याची गरज असते किंवा जन्माने/ पदाने अत्युच्च असण्याची गरज असते. या दोहोंमुळे ही व्यक्ती पूजनीय ठरत असे, लोकांच्या निष्ठा राजाकडे अबाधित राहत आणि त्यायोगे राज्य आणि राजा सुरक्षित राहत असे. कर्तृत्वाने नेमके किती मोठे व्हायला हवे याच्या सीमा आखलेल्या नसल्याने आणि प्रत्येक व्यक्तीच्या कर्तृत्वाला मर्यादा असल्याने स्वतःला सुरक्षित ठेवण्यास केवळ कर्तृत्वाचा उपयोग नाही; त्यापेक्षा भव्य काहीतरी उभे करायला हवे ही जाणीवही राज्यपद उपभोगणाऱ्यांना झाली असावी. हे जे काही भव्यदिव्य आहे ते मानवी हस्तक्षेपा पलीकडले असणे किंवा अमानवी असणे किंबहुना ते तसे दाखवणे पथ्यावर पडले. याचे कारण विज्ञानाचा अभाव, नैसर्गिक आपत्ती किंवा न उमजणाऱ्या गोष्टींना सर्वसामान्य जनतेने ईश्वरी संकेत मानणे. या गोष्टी आपल्या हातात नाहीत किंवा या गोष्टींना आपण रोखू शकत नाही, या आपल्या मानवी शक्तीच्या पल्याड आहेत या भावनेतून ईश्वराबद्दल दरारा निर्माण झाला आणि याच भावनेतून जन्माने मोठे होणे -उच्च असणे या संकल्पनेची निर्मिती झाली. राजा हा साक्षात ईश्वराचा अंश आहे किंवा साक्षात ईश्वराची त्याच्यावर कृपादृष्टी आहे असे दर्शवून देणे हे राज्यव्यवस्था आणि पद सुरक्षित ठेवण्यास कारणीभूत ठरते याची जाणीवही माणसाला झाली. निर्विवाद वर्चस्व राखण्यासाठी या युक्तीचा वापर हमखास होऊ लागला.

जगातील बहुतेक सर्व प्राचीन संस्कृतींमध्ये अशाप्रकारे राजाला किंवा टोळीप्रमुखाला ईश्वरी अंश, देवाचा पुत्र किंवा साक्षात भगवंत मानण्याची प्रथा आहे. आपल्या महाकाव्यांचा विचार करता त्यातील कोणतेही महापुरुष मानवी नाहीत असे दिसून येईल. कथेतील मुख्य पात्रांचे चमत्कारिक जन्म, पुनर्जन्म, अवतार वगैरे गोष्टी सदर पात्रे सामान्य मनुष्यापेक्षा वेगळी आणि वरचढ होती हे दाखवण्यासाठी केलेला आढळतो. महाभारतातील जवळपास सर्व पात्रांचे जन्म चमत्कारिक आहेत. या पात्रांना दैवी गुण चिकटवलेले आहेत. याचप्रमाणे, इलियडचा विचार केला तरीही अशाचप्रकारचे संदर्भ आढळतात. इतरत्र इतिहासात डोकावले तर इजिप्तमध्ये राजाला देव मानण्याची प्रथा आढळते. राजा (फॅरो) हा होरस हा देवाचा पुनर्जन्म मानला जाई. इजिप्तची प्रसिद्ध फॅरो क्लिओपात्राने स्वतःला इजिप्शिअन देवता आयसीस म्हणून घोषित केले होते. तिच्या आयसीसच्या रूपातील प्रतिकृती आढळतात. चीनमध्ये राजा हा स्वर्गपुत्र असल्याचे मानले जाई, रोमन संस्कृतीत राजाला देव मानण्याची प्रथा होती, इंका संस्कृतीही राजाला देव मानत असे आणि अशा अनेक संस्कृतीत राजाला अमानवी गुणांचा धनी बनवल्याचे दिसून येईल.

अलेक्झांडर द ग्रेट हा झ्यूसचा पुत्र आहे हे स्वतः त्याची आई सांगत असे आणि तो पद्धतशीर प्रचार होता. पुढे सिवाच्या चेटक्याने अलेक्झांडर हा अमुनचा मुलगा असल्याचे म्हटले पण ग्रीकांनी तो झ्यूसचा मुलगा असल्याचे सिद्ध झाले अशी अलेक्झांडरच्या गोटातून बतावणी केली गेली. रोमन सम्राट ऑगस्टसला देव म्हणून घोषित करण्यात आले होते. गौतम बुद्धाच्या जन्मापूर्वी त्याच्या आईला पोटी अद्वितीय पुत्र जन्म घेतो आहे असे स्वप्न पडल्याचे सांगितले जाते. अशोकाच्या शिलालेखात देवांना प्रिय या विशेषणाचा सातत्याने वापर केलेला दिसतो. हुमायूनलाही स्वप्नातून आपल्याला अद्वितीय पुत्र होणार आहे हे कळून चुकले होते. अकबरावर सलीम चिश्तीची कृपादृष्टी असल्याच्या आणि शिवाजीराजांनाही भवानीचा दृष्टांत झाल्याच्या आख्यायिका प्रसिद्ध आहेत.रामदासांनी राजांबद्दल लिहिलेल्या या ओळी बोलक्या आहेत -


जे सत्किर्तीचे पुरुष। ते ईश्वराचे अंश।
धर्मस्थापनेचा हव्यास। तेथेची वसे।।

या आणि अशा अनेक उदाहरणांवरून राजा हा अतिमानवी शक्तींशी जवळीक साधणारा आहे हे सांगण्याचा प्रयत्न दिसतो. राजाला देवाचा अंश मानणे यापेक्षा थोडी पुढची पायरी देवराजा ही प्रथा. कंबोडियातील ख्मेर राजघराण्यात ही प्रथा दिसते. या प्रथेत राजा ही शिवस्वरूप असून सर्वश्रेष्ठ आहे असे मानले जाई. यालाच मनुष्याचे दैवतीकरण करणे असे म्हणता येईल. चंद्रशेखर यांच्या लेखात जयवर्मन राजाचा मृत्यूनंतर अवलोकेतेश्वराच्या रूपात दैवतीकरण झाल्याचा उल्लेख आहे. ही प्रथा केवळ कंबोडियातच नाही तर इतरत्रही आढळते. मानवी आयुष्यात किंवा मानवी मृत्यूनंतर त्याला देवाच्या जागी बसवणे हे भारतीय संस्कृतीला नवे नाही. व्यक्तिपूजा, अवतार, महात्मा वगैरे अनेक शब्द मनुष्याला अतिमानवी शक्तीच्या जवळ घेऊन जातात आणि जसे हे भारतीय संस्कृतीला नवे नाही तसे जगातील इतर संस्कृतींनाही हे "दैवतीकरण" नवे नाही. दैवतीकरणाची ही पद्धत वर्षानुवर्षे सुरू आहे आणि आता राजे गेले तरी नेत्यांच्या रूपात ही पद्धत सुरू राहिल किंबहुना महात्म्यांच्या उपाधीतून सुरू असल्याचेच जाणवते.






होमरचे दैवतीकरण


अशाचप्रकारच्या दैवतीकरणाचा उल्लेख डॅन ब्राऊनच्या लॉस्ट सिंबलमध्ये अनेकांनी वाचला असेल. जॉर्ज वॉशिंग्टनच्या मृत्यूपश्चात त्याचे दैवतीकरण यू. एस. कॅपिटल बिल्डिंगच्या रोटुंडाच्या छतावर दिसते. याला ऍपॉथिओसिस ऑफ जॉर्ज वॉशिंग्टन (apotheosis of George Washington) म्हणून ओळखले जाते. दैवतीकरणाची ही पद्धत अर्थातच ग्रीक किंवा रोमनांची. टायटसच्या प्रसिद्ध कमानीच्या छतावर (The Arch of Titus, बांधकामः सुमारे इ. स. ८१) सम्राट टायटसचे दैवतीकरण दिसते. इलियड आणि ओडिसीचा निर्माता महाकवी होमर याच्या दैवतीकरणाचे प्राचीन शिल्पही उपलब्ध आहे. कॉन्स्टंटिनो ब्रुमिडी या इटालियन चित्रकाराने १८६५ मध्ये यू. एस. कॅपिटल बिल्डिंगच्या छतावर ही चित्रकारी केली. सन १८६२ मध्ये हे चित्र काढण्याची परवानगी मिळाल्याचे कळते. ही परवानगी यू. एस. कॅपिटॉल बिल्डिंगचा प्रमुख स्थापत्यशास्त्रज्ञ थॉमस वॉल्टरकडून ब्रुमिडीला मिळाल्याचे कळते. याआधी १८६०मध्येही एका जर्मन चित्रकाराने वॉशिंग्टनच्या दैवतीकरणाचे पेंटिंग तयार केले होते. या चित्राचा पगडा कॅपिटॉल बिल्डिंगीतील चित्रावर असल्याचा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जातो. जॉर्ज वॉशिंग्टनला अमेरिकेच्या राष्ट्रपित्याचा दर्जा या आधी अनेक वर्षे मिळालेला होता. त्याची लोकप्रियता मृत्यूनंतरही वाढत गेली. याचा फायदा घेण्यासाठी हे चित्र तयार करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते. ब्रुमिडीला महिना दोन हजार डॉलर्सच्या तनख्यावर हे चित्र काढण्याची परवानगी मिळाली. तयार झालेले चित्र अनेकांच्या पसंतीस पडले हे वेगळे सांगायला नको. आधुनिकतेचा मानदंड हाती घेऊन वावरणाऱ्या अमेरिकेचा पहिला देव जॉर्ज वॉशिंग्टन मानला जावा ही इच्छा प्रकट करण्यात हे चित्र सफल झाल्याचे दिसते.

जॉर्ज वॉशिंग्टनचे दैवतीकरण

DSC02325

वॉशिंग्टनच्या दैवतीकरणाच्या या एका चित्रात एकूण सात दृश्ये आहेत. मध्यभागी १३ कुमारिकांसह जॉर्ज वॉशिंग्टन स्वर्गारोहणासाठी तयार झालेला दिसतो. १३ कुमारिका अमेरिकेच्या तत्कालीन १३ वसाहती दाखवतात. वॉशिंग्टनच्या डोक्यावर E Pluribus Unum (विविधतेत एकता) हे अमेरिकेचे घोषवाक्य दिसते. वॉशिंग्टनच्या चित्रासभोवताली इतर ६ चित्रे दिसतात आणि ही सर्व चित्रे प्रगतिशील अमेरिकेत होणारे दैवतीकरण दर्शवतात.

युद्ध - केंद्रभागातील वॉशिंग्टनच्या पायथ्याशी दिसणाऱ्या या चित्रात अमेरिकेची स्वातंत्र्यदेवता कोलंबिया शत्रूचा नि:पात करताना दिसते. तिच्यासह अमेरिकेचा राष्ट्रपक्षी गरूडही दिसतो.

विज्ञान - मिनर्वा ही बुद्धी आणि कलेची रोमन देवता. ती या चित्रात अमेरिकेचे सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ बेंजामिन फ्रँकलीन, रॉबर्ट फुल्टॉन आणि सॅम्युएल मोर्स यांना बहुधा विद्युतजनित्राबाबत महत्त्वाचे सल्ले देत आहे. मिनर्वा हे ग्रीक देवता अथीनाचे रूप. वॉशिंग्टन डिसीच्या शहरात इतत्रही ती अनेकदा दिसून येते.

नौधन(सागरी)- समुद्राचा रोमन सम्राट नेपच्यून या चित्रात दिसतो. तसेच समुद्रातून प्रकट झालेली प्रेमाची रोमन देवता वीनसच्या हाती 'ट्रान्सअँटलांटीक टेलेग्राफ केबल' दिसते. या केबलद्वारे अमेरिका आणि युरोपचा संपर्क साधण्याचे प्रयत्न १८५७ ला सुरू झाले होते.

वाणिज्य - मर्क्यूरी हा रोमन व्यापाराचा आणि अर्थकारणाचा देव येथे रॉबर्ट मॉरिस या अमेरिकन व्यापारी आणि राजकारण्याला अमेरिकन अर्थव्यवस्थेच्या मदतीसाठी सोन्याने भरलेली पुरचुंडी देताना दिसतो.

यांत्रिकी - या चित्रात वल्कन हा लोहारांचा रोमन देव स्टीमबोट आणि तोफांच्या बांधणीवर काम करताना दिसतो.

शेतकी - सेरेस ही रोमन पीक पाण्याची देवता सायरस मॅकॉर्मिक या प्रसिद्ध अमेरिकन शेतकऱ्याने तयार केलेल्या पीक कापणी यंत्रावर आरूढ दिसते.

चित्राविषयी याहून अधिक माहिती आंतरजालावर शोधल्यास सहज उपलब्ध आहे. ज्यांना फ्रीमेसनरीच्या कॉन्स्पिरसी थिअरीत रुची आहे त्यांच्यासाठी थॉमस वॉल्टर, १८६५ मधील अमेरिकन अध्यक्ष अँड्र्यू जॉनसन हे दोघे फ्रीमेसन्स होते. तत्पूर्वीचे अब्राहम लिंकन हे फ्रीमेसन नसले तरी सदस्यत्वासाठी त्यांनी अर्ज दाखल केला होता पण त्यांच्या मृत्यूमुळे ते फ्रीमेसन बनले नाहीत असे कळते. चित्रात दिसणारे बेंजामिन फ्रँकलिन हे फ्रीमेसन होते आणि अर्थातच जॉर्ज वॉशिंग्टन हे स्वतःही फ्रीमेसन होते.

अधिक माहिती:
वॉशिंग्टनचे दैवतीकरण


क्लिओपात्राचे आणि होमरचे चित्र विकिपिडीयावरून घेतले आहे.