Friday, December 18, 2009

वेडात वीर दौडले... तीनशे सात

म्यानातून उसळे तरवारीची पात
वेडात मराठे वीर दौडले सात


कुसुमाग्रजांच्या या अप्रतिम पंक्तींनी मराठी मानसात आणि मराठी साहित्यात प्रतापराव गुजर आणि त्यांच्या साथीदारांना मानाचे पान दिलेले आहे. इतिहासात मात्र पावनखिंडीला जे स्थान आहे ते नेसरीच्या खिंडीला नाही असे दिसते. महाराजांचा शब्द पाळण्यात सरसेनापती चुकले. त्यांनी भावनेच्या भरात आपले प्राण खर्ची घातले. राज्याभिषेकाआधी काही थोडक्या दिवसांत राज्याला सेनापती नाही अशी स्थिती राज्यात निर्माण झाली. असे नेमके काय झाले होते प्रतापरावांकडून, याविषयी सर्वश्रुत असणारी कहाणी पुढीलप्रमाणे -


सन १६७३ साली शिवराज्याभिषेकापूर्वी काही महिने, महाराज पन्हाळगडावर स्थित होते. याचकाळात अदिलशाही सरदार बहलोलखान हत्ती-घोड्यांचे वीस हजारी सैन्य घेऊन स्वराज्यावर चालून आला. याची खबर लागताच प्रतापराव गुजर आणि इतर मान्यवर सरदारांना शिवाजीराजांनी गडावर बोलावले आणि आज्ञा दिली की "खान वलवल भारी करतो, त्यास मारोन फते करणे. ”


महाराजांची आज्ञा घेऊन प्रतापराव आपल्या सैन्यानिशी बहलोलखानावर चालून गेले. बहलोलखानाचा मुक्काम डोण नदीजवळ उमराणी गावी होता. मराठ्यांनी सर्वप्रथम एका बाजूने खानाला पाण्यापासून तोडले आणि दुसऱ्या बाजूने त्यावर हल्ला चढवला. त्यानंतर झालेल्या तुंबळ लढाईत खानाला मराठ्यांनी धूळ चारली. पाण्याशिवाय आणि मराठी सैन्याच्या हल्ल्याने कासावीस झालेल्या खानाला शरणागती पत्करण्यावाचून दुसरा पर्याय राहिला नाही. त्याने प्रतापरावांकडे आपला वकील पाठवला. वकिलाच्या रदबदलीने आणि गोड शब्दांनी प्रतापरावांचे मन द्रवले. खानाला असा हिसका दाखवल्यानंतर तो पुन्हा फिरून येणार नाही अशी खात्री त्यांना वाटली आणि त्यांनी वकिलाच्या प्रार्थनेचा स्वीकार करून खानाला अभय दिले. इतकेच नाही तर त्याला कैद न करता, मुक्काम हलवण्यास वाट करून दिली.


या लढाईची बातमी महाराजांना कळल्यावर ते साहजिकच चिडले. महाराजांच्या स्पष्ट आज्ञेचे पालन करण्यात प्रतापराव चुकले होते. बहलोलखान पराभवाचा बदला घेण्यास परतून येईल अशी शंका त्यांना होतीच. त्यांनी प्रतापरावांना खरमरीत पत्र लिहून "सला काय निमित्य केला? ” असा जाब विचारला. तुम्ही शिपाईगिरी केलीत, सेनापतीसारखे वागला नाहीत अशी प्रतापरावांची निर्भर्त्सना केली. या जाबाने प्रतापराव मनातून दुखावले गेले.


महाराजांच्या अंदाजाप्रमाणेच बहलोलने हल्ले पुन्हा सुरू केले. शिवराज्याभिषेकाची तयारी रायगडावर सुरू झाली होती. यांत होणारे बहलोलखानाचे हल्ले महाराजांना पचण्यासारखे नव्हते. त्यांनी संतापाने प्रतापरावांना दुसरे पत्र लिहिले, “हा बहलोल वरचेवरी येतो. यांसी गर्दीस मेळवून फत्ते करणे. अन्यथा आम्हांस तोंड न दाखवणे. ” महाराजांचे हे शब्द प्रतापरावांच्या जिव्हारी लागले. महाराजांचे लष्कर प्रतापरावांच्या मदतीला पोहोचलेले नव्हते. प्रतापराव या सुमारास गडहिंग्लज परिसरात होते. खानाचे सैन्य नेसरीच्या दिशेने चाल करून येत आहे ही खबर त्यांना लागली आणि हाताशी असणाऱ्या सहा शिलेदारांसह ते खानावर चालून गेले. खानाच्या अफाट सैन्यासमोर या सात वीरांचा निभाव लागणे केवळ अशक्य होते आणि परिणामी धाडस आणि शौर्याची परिसीमा गाठणारे हे वीर धारातीर्थी पडले. महाराजांना ही वार्ता कळल्यावर ते अतिशय दु:खी झाले. राज्याच्या सरसेनापतीला दूरदृष्टी हवी ही अपेक्षा महाराजांनी करणे स्वाभाविक होते परंतु भावनेच्या भरात प्रतापरावांसारखा निधड्या छातीचा वीर दुसरी चूक करून बसला.


प्रतापरावांच्या मृत्यूचे मराठाशाहीवर नेमके परिणाम कसे झाले याबाबत मला फारसे वाचायला मिळाले नाही परंतु सर्वसामान्य अंदाज लावायचा झाला तर राज्याचा सरसेनापती अशा रितीने मृत्यूला कवटाळतो तेव्हा सैन्यात बेबंदशाही माजण्याची शक्यता असते. राजा, प्रजा, राज्य आणि सैन्य यांचे खच्चीकरण होण्याची शक्यताही असते. २४ फेब्रुवारी १६७४ ला प्रतापरावांना वीरमरण आले आणि १६ जूनला राजांना राज्याभिषेक झाला. शिवराज्याभिषेक जवळ आला असता सरसेनापतीचा मृत्यू होणे ही घटना राज्यस्थापनेसाठी नक्कीच पूरक नसावी. निश्चलपुरी महाराजांनी अपशकुन म्हणून प्रतापरावांच्या मृत्यूचे कारण दाखवल्याची घटनाही वाचनात येते.


उतावळा, भावनाप्रधान स्वभाव आणि दूरदृष्टीचा अभाव ही कारणे राज्याचा सरसेनापती हिरावून घेण्यास कारणीभूत ठरली. इतके सर्व असूनही, प्रतापरावांच्या अतुलनीय धाडसाचे कोठेतरी कौतुक करावेसे वाटते. गैरजबाबदार कृत्य हातातून घडले तरी त्यांची स्वामीनिष्ठा वाखाणण्याजोगी होती. खुद्द महाराजांना त्याविषयी शंका असावी असे वाटत नाही. आपल्या जिवाचा, घरादाराचा, कुटुंबाचा विचार न करता केवळ स्वाभिमानाला ठेच लागली म्हणून स्वामीनिष्ठेपायी आपला जीव ओतून टाकणाऱ्या या वीरांच्या धमन्यांतील रक्तात असा कोणता गुण असावा की कोणताही इतर विचार न करता त्यांनी बहलोलखानाच्या सैन्यावर चालून जाण्याचा निर्णय घेतला; यामागील नेमकी मानसिकता समजून घेणे कठिण वाटते.


तरीही, नेसरीच्या खिंडीला पावनखिंडीचे महत्त्व नाही याचे कारण प्राणार्पण कोणी, कधी आणि नेमके कशासाठी केले याला इतिहासात महत्त्व आहे. बाजीप्रभूंचे प्राणार्पण आणि प्रतापरावांचे प्राणार्पण यांत फरक दिसून येतो. युद्धात बरेचदा हार-जीत यांच्यापेक्षाही मागाहून होणारे परिणाम महत्त्वाचे ठरतात. बाजीप्रभूंचे बलिदान महाराजांना सुखरूप ठेवण्याकामी आले. बहुधा, मूठभर सैनिकांसह बाजीप्रभू मागे राहिले तेव्हाच त्यांचा मृत्यू अटळ आहे हे सर्वांना माहित असावे. प्रतापरावांच्या बाबत तसे होत नाही. कुसुमाग्रजांच्या अजरामर कवितेने मात्र प्रतापरावांच्या प्राणार्पणाचे उदात्तीकरण झाले. या कथेसारखी भासणारी पाश्चात्य इतिहासातील एक प्रचलित कथा पुढे देता येईल. ती म्हणजे थर्मापलैयच्या लढाईची.


प्राचीन ग्रीकमधील अथेन्स आणि स्पार्टा ही दोन प्रसिद्ध शहर-राज्ये गणली जातात. अथेन्स आणि स्पार्टा एकमेकांपासून फार लांब नाहीत परंतु या दोन्ही राज्यांचे नीतिनियम, कायदे भिन्न होते. अथेन्स हे समुद्राजवळ असल्याने समुद्र व्यापारात हे राज्य अग्रेसर होते. व्यापाराच्या निमित्ताने अनेकविध संस्कृतींशी आलेल्या संबंधातून अथेन्सवासीयांचा सामाजिक, राजकीय दृष्टीकोण पुरोगामी होता. या उलट, स्पार्टा हे ग्रीक प्रदेशात आतवर वसलेले शहर-राज्य. सर्व बाजूंनी जमिनीने वेढलेले. शत्रूराज्यांमुळे सतत सावध असलेले आणि त्यामुळे सांस्कृतिक बाबींमध्ये संकुचित राहिलेले. स्पार्टाचे कायदे आणि नीतिनियम हे अथेन्सपेक्षा क्रूर होते. केवळ सुदृढ मुलांना येथे वाचवले जाई. अशक्त आणि अपंग बालकांना मारले जाई. लष्करी प्रशिक्षण सक्तीचे होते. दोन्ही शहरांत गुलामगिरीची प्रथा अस्तित्वात होती. यापैकी, स्पार्टातील गुलामांना हेलॉट असे संबोधले जाई. इतर राज्यांतील गुलामांपेक्षा हेलॉटांना थोड्या अधिक सवलती होत्या. त्यांना जमीन कसता येई पण इतर नागरिकांपेक्षा अधिक शेतसारा भरावा लागे. स्पार्टाच्या नागरिकांकडून हेलॉटचा मृत्यू हा दखलपात्र गुन्हा नसे. प्रामुख्याने हेलॉट हे कामगार किंवा कलाकार असत. सैन्यातही त्यांची भरणा होई. आपले स्वातंत्र्य त्यांना विकत घेण्याची मुभा होती.


अथेन्स आणि स्पार्टाप्रमाणेच ग्रीसमध्ये इतर अनेक लहान-मोठी राज्ये होती. ग्रीसच्या जवळचे प्रबळ राष्ट्र पर्शियाचे. पर्शियाचा सम्राट झेरेक्सिस याने इ.स.पूर्व ४८३ पासून सैन्याची मोठी जमवाजमव केली आणि इ.स.पूर्व. ४८० मध्ये ग्रीसवर भूमार्गे आणि समुद्रमार्गे लाखोंच्या सैन्यानिशी हल्ला चढवला. झेरेक्सिसने हल्ल्याची वेळ ऑलिंपिक्सचे खेळ आणि कार्निया या ग्रीक सणाच्या सुमारास ठरवली होती. याचे कारण या काळात ग्रीक शस्त्रे उचलत नसत. कार्नियाच्या दिवसांत शस्त्र उचलणे दैवी कोपास कारण होऊ शकते अशी प्रचलित श्रद्धाही होती. ग्रीकांना झेरेक्सिसच्या स्वारीचा सुगावा लागताच त्यांनी आपापसांतील वैर बाजूला ठेवून एकत्रित होऊन लढायचे ठरवले. त्यानुसार समुद्रमार्गे येणारा पर्शियन सैन्याचा ताफा रोखण्यास ग्रीक सेना आर्टेमिसिअमच्या सामुद्रधुनीत एकत्रित झाल्या. स्पार्टावर या काळात लिओनायडस या राजाचे राज्य होते. त्याची सेनाही मित्र ग्रीक सेनेत सहभागी होती. असे म्हणतात की स्वारीपूर्वी लिओनायडस डेल्फायच्या पुजारीणीचा सल्ला घेण्यास गेला असता तिने त्याला भविष्य सांगितले होते की "पर्शियन युद्धात एकतर स्पार्टाचा विनाश होईल आणि तसे न होता राज्य वाचले तर राजाचा विनाश नक्की होईल. "

  1. द स्पार्टन्स - द वर्ल्ड ऑफ द वॉरिअर हिरोज ऑफ एन्शंट
  2. डिसिजीव बॅटल्स - थर्मापलै - हिस्टरी चॅनेल
    विकिवर लिओनायडसप्रतापरावांवरील मटामधील लेख

याखेरीज वर्तमानपत्रांतील अनेक लेखांचा संदर्भ.
चित्रे:
सर्व चित्रे विकिपिडीयावरून

Thursday, September 03, 2009

एक डॉलरचे रहस्य

दा विंची कोड ही डॅन ब्राऊनची सुप्रसिद्ध कादंबरी आपल्यापैकी अनेकांनी वाचली असेल किंवा तिच्याबद्दल ऐकले असेल. काही प्राचीन रहस्यांचा शोध, ऐतिहासिक रहस्यांचा पाठपुरावा आणि काही प्राचीन गुप्तसंस्थांचे कामकाज असा साचा डॅन ब्राऊनच्या कादंबर्‍यांत सहसा आढळून येतो. दा विंची कोडमधील प्रायॉरी ऑफ झायन आणि एंजल अँड डिमन्स या दुसर्‍या कादंबरीतील इल्युमिनाती या गुप्तसंस्था या कादंबऱ्यांचा गाभा आहेत. एंजल्स अँड डिमन्स मधील एका प्रसंगात, कादंबरीची नायिका वित्तोरिया वेत्रा, रॉबर्ट लॅंग्डनला विचारते की "तू प्राचीन चिन्हशास्त्राकडे कसा काय वळलास? " याचे उत्तर देताना तो सांगतो "मला या शास्त्राबद्दल आवड उत्पन्न झाली ती एक डॉलरच्या नोटेमुळे! "

आपल्यापैकी अनेकांनी कधी ना कधी अमेरिकन डॉलरची नोट किंवा अमेरिकन पद्धतीत म्हणतात तसे, डॉलर-बिल हाताळले असावे. अमेरिकन डॉलर वापरून व्यवहार केला असावा, आपल्या खिशात, पाकिटात, पर्समध्ये डॉलर-बिल ठेवले असावे. परंतु हे करताना आपण एक प्राचीन रहस्य आपल्यासोबत बाळगतो आहोत याची जाणीव फार कमीजणांना असावी. एक डॉलरच्या नोटेकडे निरखून पाहिले तर एक गोष्ट दिसून येईल की नोटेच्या एका बाजूस संयुक्त संस्थानांचे पहिले अध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांचे चित्र असून दुसर्‍या बाजूस अमेरिका किंवा अमेरिकन इतिहासाशी दूरवर संबंधीत नसणारा एक वर्तुळाकार शिक्का आहे. या वर्तुळात एक इजिप्शियन पिरॅमिड दिसते. हे पिरॅमिडही पूर्ण नाही. मध्येच कापलेले आहे. त्याच्या शिखरावरील भागात एक प्रकाशमान डोळा असून पायथ्याशी रोमन आकडे दिसतात. पिरॅमिडच्या वर आणि खाली लॅटीन भाषेतील मजकूर आहे. गेली कित्येक वर्षे लोकांना हे चिन्ह नेमके का निवडले गेले हे गूढ उलगडलेले नाही आणि यामागे एक प्राचीन "काँस्पिरसी थेअरी" असल्याची आख्यायिका सुप्रसिद्ध आहे. अनेकांच्या मते हे चिन्ह फ्री-मेसन्स या प्राचीन गुप्तसंघटनेची देणगी असून अमेरिकेचे माजी अध्यक्ष आणि फ्री-मेसन संघटनेचे कार्यकर्ते फ्रॅंकलीन रूझवेल्ट यांनी त्याला डॉलरच्या नोटेवर स्थानापन्न केले आहे.



सर्वसाधारणत: या चिन्हाची माहिती काढायला गेले असता केवळ प्रेसिडेंट रूझवेल्ट यांचा या प्रकारात समावेश नसून हे चिन्ह अमेरिकेच्या राष्ट्रीय शिक्क्यावरही (Great Seal) असल्याचे सांगितले जाते. या शिक्क्याची निर्मिती १८ व्या शतकात करण्यात आली असून तिचा संबंध अमेरिकेचे आद्य संस्थापक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेंजामीन फ्रॅंकलीन यांच्याशी जोडला जातो. शिक्क्यावर असणार्‍या या चिन्हाची माहिती पुढीलप्रमाणे मिळते -

चिन्हातील खालचा अपूर्ण पिरॅमिड हा १३ पायऱ्यांचा बनलेला असून नंतर कापलेला आहे. पिरॅमिडच्या वरील भागात एक सर्वदर्शी नेत्र आहे. प्राचीन इजिप्शियन संस्कृतीप्रमाणे हे ईश्वराचे सर्वव्यापी आणि संपूर्ण मानवजातीवर देखरेख करणारे नेत्र असल्याचे मानले जाते. पिरॅमिडच्या पायथ्याशी रोमन क्रमांक दिसतो. या पिरॅमिडच्या वर Annuit Coeptis ही लॅटीन वाक्यरचना आढळते तिचा अर्थ "कार्यारंभास त्याचा (देवाचा) आशीर्वाद आहे" आणि पिरॅमिडच्या खाली असणाऱ्या Novus Ordo Seclorum या वाक्यरचनेचा अर्थ "नव्या जगाची व्यवस्था" असा सांगितला जातो. इथे लक्षात घेण्यासारखा मुद्दा असा की बेंजामीन फ्रॅंकलीन हे देखिल फ्रीमेसन होते.

अशीच एक गोष्ट सांगितली जाते ती थोरले जॉर्ज बुश यांच्या संदर्भात आहे. अमेरिकेच्या अध्यक्षपदाची शपथ घेण्यापूर्वी जॉर्ज बुश यांनी अमेरिकेचे संयुक्त राष्ट्रांतील राजदूत आणि अमेरिकेची गुप्तहेर संस्था सी. आय. ए. चे प्रमुख म्हणून पदे भूषविली होती. १९८९ च्या जानेवारी महिन्यात जॉर्ज बुश यांचा शपथविधी झाला तेव्हा सर्वसामान्यांच्या लक्षात न येईल अशी एक गोष्ट घडली होती. ती म्हणजे शपथविधी दरम्यान वापरली गेलेली बायबलची आवृत्ती हे नेहमीच्या बायबलपेक्षा वेगळी होती. ही आवृत्ती फ्रीमेसनांच्या गूढ आकृत्या आणि चित्रांनी सजलेली होती आणि हीच आवृत्ती अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांनी शपथविधीसाठी वापरली होती.

अमेरिकेचे चौदा अध्यक्ष हे फ्रीमेसन्स होते असे मानले जाते. जॉर्ज वॉशिंग्टन, थिओडोर रुझवेल्ट, अँड्रू विल्सन, फ्रॅंकलीन रुझवेल्ट, हॅरी ट्रुमन आणि थोरले जॉर्ज बुश हे त्यापैकी काही प्रमुख राष्ट्राध्यक्ष. यापैकी, ट्रुमन हे अमेरिकन गुप्तहेर संस्था सीआयएचे जनक होत. बॉस्टन टी पार्टीतील सहभागापासून अमेरिकेची घटना लिहिणाऱ्यांपैकी अनेकजण फ्रीमेसन असल्याचे पुरावे सादर केले जातात. अब्राहम लिंकन यांनीही फ्रीमेसन संस्थेचे सदस्यत्व घेण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जाते आणि यावरून अमेरिकन सरकार नावाचे कळसूत्री बाहुले फ्रीमेसनांच्या गुप्तसंघटनेकडून नाचवले जाते अशी अटकळ बांधली जाते.

फ्रीमेसनांची संस्था ही एक अतिशय प्राचीन गुप्त बंधुभावसंवर्धिनी (Fraternal Organization) असून त्यात कोणत्याही जाती-धर्माचे लोक सामील होऊ शकतात याखेरीज या संस्थेची माहिती अनेकांना नसते. ही संघटना कशी अस्तित्वात आली, तीत सामील होण्यासाठी कोणत्या अटींची पूर्तता करावी लागते, त्यांनी राखून ठेवलेली प्राचीन गुपिते कोणती वगैरे अनेक प्रश्नांची उत्तरे सहसा उपलब्ध नाहीत. माहिती शोधत जाता जे थोडेफार धागेदोरे हाती लागतात ते असे -

फ्रीमेसनरी या संस्थेचा उगम स्टोनमेसन्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाथरवट आणि शिल्पकारांशी निगडित आहे. ही संस्था कधी अस्तित्वात आल्याचे कळत नसले तरी बायबलमधील प्रसिद्ध राजा सॉलोमन (सुलेमान) याचे मंदिर बांधताना त्याच्या हायरम अबीफ या प्रमुख स्थापत्यकाराची हत्या कोणतेतरी गुपित काढून घेण्यासाठी केली गेल्याचे सांगितले जाते आणि आपल्या प्राणांची किंमत देऊन ते गुपित जपणारा स्थापत्यकार, फ्रीमेसन असल्याचे सांगितले जाते. किंबहुना, फ्रीमेसनरीच्या घटनेतील एक प्रमुख मुद्दा - गुपिताचे रक्षण प्राण जाईस्तोवर करायचे असा असतो. ही प्राचीन गुपिते कोणती या बद्दल अनेक अटकळी आहेत. सुलेमानचा खजिना, होली ग्रेलचे गुपित, मध्ययुगात युरोपात मुसलमानांविरुद्ध काढल्या गेलेल्या धार्मिक युद्धमोहिमा (क्रुसेडस), अनेक मध्ययुगीन राज्यक्रांत्या, राजकीय स्थित्यंतरे आणि अशा अनेक ऐतिहासिक गुपितांचे रक्षणकर्ते फ्रीमेसन्स असल्याचे सांगितले जाते. डॅन ब्राऊनच्या दा विंची कोडमुळे प्रसिद्ध झालेले सरदार नाइट टेंप्लारही फ्रीमेसन्स असल्याचे समजले जाते. आख्यायिकांचा आणि दंतकथांचा भाग सोडल्यास फ्रीमेसन्स ही संस्था खरी असली तरी ही प्राचीन गुप्तसंस्था काळाच्या उदरात कधीतरी गडप झाली असे दिसते.

त्यानंतर इ.स. १७१७ साली किंवा त्या सुमारास इंग्लंडमध्ये फ्रीमेसन्स संस्थेचा जीर्णोद्धार करण्यात आला. मूळ मेसन्स हे दगड कापणारे, घडवणारे आणि शिल्पकाम करणारे पाथरवट असले तरी १८ व्या शतकात या संस्थेचे पुनरुत्थान काही राजकारणी, उमराव, साहित्यिक, व्यावसायिक आणि कलाकारांनी केल्याचे सांगितले जाते. १८ व्या फ्रीमेसनरीची घटना, विधी,

गुपिते, कूटशब्द इतकेच नव्हे तर नवी लिपी तयार करण्यात आली. कूटशब्द आणि गुपिते राखून ठेवण्यासाठी प्राणांची शपथ घालण्याची प्रथा निर्माण करण्यात आली. मुख शहरांत फ्रीमेसन्सची आलिशान आणि ऐश्वर्यसंपन्न सभागृहे आहेत. यांना ग्रँड लॉजेस म्हणून ओळखले जाते. स्थापत्यशास्त्राची उपकरणे वापरून त्या मध्यभागी G लिहिलेले शेजारील चित्रातील हे बोधचिन्ह पाश्चात्य जगतात कुठेना कुठे नजरेस पडते. या अक्षराचे गूढही कोणाला सुटलेले नाही. God, Goodness, Geometry अशा अनेक अटकळी बांधल्या जातात. तरी, जगातील सर्वश्रेष्ठ स्थापत्यकार ईश्वराला मानवंदना देण्यासाठीच G हे अक्षर येते असे अनेकजण मानतात. युरोपातील आणि प्रामुख्याने अमेरिकन सरकारवर या संघटनेचा मोठा प्रभाव असल्याचे मानले जाते. फ्रीमेसनरी ही तिच्या राजकारणातील सहभागामुळे बऱ्यापैकी कुप्रसिद्धही गणली जाते. राजकीय हत्या, हल्ले, स्थित्यंतरे यांत या संस्थेचा सहभाग असल्याच्या वदंता प्रसिद्ध आहेत.

परंतु, या सर्व सांगोवांगीच्या कथा आहेत की यात काही तथ्यांशही आहे याचा मागोवा घेताना तज्ज्ञ ही कॉन्स्पिरसी थिअरी अर्थातच मोडीत काढतात. त्यांचे काही ठोस मुद्दे असे -

अमेरिकेचा शिक्का निश्चित करण्यात बेंजामीन फ्रँकलीन हे एकटेच नव्हते. त्यांच्यासोबत इतर अनेक होते आणि ते फ्रीमेसन असल्याचे पुरावे नाहीत. अमेरिकन शिक्क्यातील फ्रँकलीन यांनी सुचवलेला काही भाग नाकारण्यातही आला होता. बॉस्टन टी पार्टीची आखणी सर्वस्वी फ्रीमेसन्सनी केली होती याला पुष्टी देणारे संदर्भ सापडत नाहीत. फ्रीमेसन्स आणि इजिप्त व इजिप्तमधील पिरॅमिडस यांचा कोणताही संबंध असल्याचे दाखले नाहीत. हायरम अबीफच्या खुनाचा ऐतिहासिक पुरावा मिळत नाही आणि त्याच्यामुळे प्राणांची शपथ घालण्याचा विधी फ्रीमेसन संस्थेत रुजू झाल्याची कथा केवळ दंतकथा आहे. फ्रीमेसनरी ही कोणत्याही प्रकारे गुन्हेगारी स्वरूपाची संस्था असल्याचे सिद्ध झालेले नाही. काही विद्वानांनी एकत्र येऊन सुरू केलेली आणि स्वयंप्रेरणेने ज्यांना या संस्थेत सहभागी व्हावे असे वाटते त्यांना सभासदत्व देणारी ही संस्था आहे इतकेच.

याचप्रमाणे, एक डॉलरच्या रहस्याचा मागोवा घेता, या नोटेवरील १३ पायऱ्यांच्या पिरॅमिडमधील १३ हा आकडा अमेरिकेच्या १३ मूळ वसाहती दर्शवतो. हा अपूर्ण पिरॅमिड राष्ट्रबांधणीचे आणि एकजूटीचे काम अद्याप बाकी आहे असे सांगतो. या पिरॅमिडच्या पायथ्याशी असणारा MDCCLXXVI हा रोमन क्रमांक १७७६ हे वर्ष दर्शवतो. १७७६ मध्ये अमेरिकेच्या "डिक्लरेशन ऑफ इंडिपेंडस"वर शिक्कामोर्तब झाले होते. Novus Ordo Seclorum या वाक्यरचनेचा अर्थ आहे "नव्या युगाची व्यवस्था" कारण ते १७७६ सालापासून सुरू झाले असे गणले जाते.

रहस्य, गुपिते, थरार यांचे मानवी मनाला अनादी कालापासून आकर्षण आहे. दंतकथा या सत्यापेक्षा अधिक आकर्षक असतात आणि लोकांच्या मनात घर करून राहतात. त्या सर्वस्वी खऱ्या असतीलच असे नाही पण तथ्यांश नक्कीच असू शकतो. आपल्याला विश्वासाचा कोणता धागा पकडून पुढे जायचे हे प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून असते. इतरांपेक्षा आपण वेगळे आहोत, इतरांपेक्षा आपल्याला काकणभर अधिक ज्ञान आहे, वेगळ्या आणि महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला माहित आहेत आणि आपण त्या इतरांपासून सुरक्षित ठेवू शकतो ही भावना माणसाला लहानपणापासूनच सुखावत असते. इतिहासात अनेकदा अशा गुप्तसंस्थांचा उल्लेख आढळतो. प्रायॉरी ऑफ झायन नावाची राजवंशाचे किंवा येशूच्या वंशाचे पुरावे जपून ठेवणारी आणि त्यांना संरक्षण देणारी गुप्तसंथा, भक्त आणि श्रद्धाळूंच्या संरक्षणासाठी निर्माण करण्यात आलेली नाइट टेंप्लार ही संघटना, रहस्यांचे राखण करून राजकारणात आपला ठसा उमटवणारी फ्रीमेसन्स ही संघटना आणि यापेक्षा थोड्या वेगळ्या गुन्हेगारी वाटेने जाणाऱ्या असॅसीन किंवा हश्शाशीन ही हशीशाच्या अंमलाखाली सदस्यांकडून गुन्हे करवून घेणारी संघटना आणि खुद्द भारतातील ठग या नावाने प्रसिद्ध पावलेली गुन्हेगारी संघटना अशा अनेक गुप्त संघटना जगाच्या इतिहासात कार्यरत असल्याचे आढळून येते. या संघटनांत सामील होण्यासाठी लागणारी सदस्य पात्रता, त्यांचे शपथविधी, गुप्त ठिकाणी गुप्ततेत पार पाडले जाणारे विधी, त्यांची कार्यपद्धती या सर्वांनी समाजाला वर्षानुवर्षे भुऱळ पाडली आहे. डॅन ब्राऊनची नवी कादंबरी लवकरच येत आहे आणि ती सुलेमान राजाने बांधलेले प्राचीन मंदिर आणि फ्रीमेसन्स या गुप्तसंस्थेवर आधारित आहे. त्या कादंबरीच्या निमित्ताने फ्रीमेसनरीवर पुनश्च चर्चा सुरू होईल. नवी माहिती बाहेर येईल. नवी संशोधने केली जातील. तूर्तास, ही संस्था अद्यापही जगभरात कार्यरत आहे आणि अमेरिकेचे अनेक राष्ट्राध्यक्ष फ्रीमेसन्स होते एवढे सत्य एक डॉलरच्या नोटेवरच्या या चिन्हामागील रहस्याचे गूढ कायम राखण्यास पुरेसे आहे.


--------------------------------------------------------------------------------
लेखासाठी वापरलेली सर्व चित्रे विकिपीडियावरून घेतली आहेत.
संदर्भः
डोन्ट नो मच अबाऊट मायथॉलॉजी - केनेथ डेविस
एंजल्स अँड डिमन्स - डॅन ब्राऊन
सीक्रेट्स ऑफ फ्रीमेसनरी - डिस्कवरी चॅनेलवरील माहितीपट
फ्रीमेसनरी - विकिपीडिया
एक डॉलरचे अमेरिकन बिल

Monday, April 20, 2009

जपून! ते लक्ष ठेवून आहेत

Seeing this obscene thing is a shock; what is worse is seeing people passing to and fro beneath it, intent on either plotting their day's business or planning their evening's pleasure; they pass to and fro and do not look up.

None of them look up.

I hear him say it again: We don't see them... but they see us.

- Stephen King
Nightmares in the sky


सुप्रसिद्ध भयकथा लेखक स्टीफन किंग यालाही अंगावर शहारे आणणारे असे काही अस्तित्वात आहे ही कल्पनाच मोठी रोचक आहे. वर उद्धृत केलेली वाक्ये स्टीफन किंगच्या एखाद्या प्रसिद्ध कादंबरीतील नसून एका विशिष्ट प्रकारच्या शिल्पकलेवरील चित्रांच्या पुस्तकासाठी किंग यांनी केलेले हे भाष्य आहे. मध्ययुगात प्रामुख्याने प्रसिद्ध झालेल्या परंतु पुरातन काळापासून सर्व संस्कृतीत चालत आलेल्या या शिल्पकलेला ढोबळमानाने गर्गॉयल्स , ग्रोटेस्क अशा नावांनी संबोधले जाते.


गरगॉयल म्हणजे काय?

सोप्या शब्दांत सांगायचे झाले तर गरगॉयल म्हणजे इमारतींवरील पाणी वाहून नेणारी आणि त्याचा निचरा करणारी नळकांडी. याला इंग्रजीत "गटर" असा शब्द आहे. ही प्रामुख्याने इमारतींच्या माथ्यावर स्थित असून नळकांड्याच्या तोटीला एखादा भयप्रद चेहरा किंवा अर्धपशूमानवी आकृतीचे शिल्प असते. यांचा मुख्य उपयोग इमारतीच्या भिंती आणि वास्तुचे पावसाच्या पाण्यापासून संरक्षण करून हे पाणी इमारतीपासून थोड्या दूर अंतरावर फेकणे हा असतो. आपल्याकडेही थोडेफार यासाठीच परंतु वेगळ्या वापरासाठी देवळांमध्ये गोमुखे दिसतात.

चित्र १: पाणी ओकणारे गरगॉयल


गरगॉयल या शब्दाची व्युत्पत्ती झाली आहे "गार्गल" या शब्दावरून. घशातून गुळण्यांसारखे आवाज करत पाणी ओकणार्‍या या शिल्पांना गरगॉयल हा ध्वन्यानुसारी शब्द अगदी चपखल बसतो. अशाचप्रकारे, इमारतींवर स्थित चमत्कृतीपूर्ण परंतु पाण्याचा निचरा न करणार्‍या शिल्पांना ग्रोटेस्क, दोन किंवा अधिक प्राण्यांच्या संकराने तयार होणारे "कायमेरा" अशा अनेक प्रकारांनी संबोधले जाते. ही शिल्पे इमारतींचे कळस, प्रवेशद्वारे, खांब, कमानी यांवर स्थित दिसतात. कायमेरा, ग्रोटेस्क आणि गरगॉयल्स यांच्यात मूलभूत फरक असला तरी प्रामुख्याने ही शिल्पे गरगॉयल्स या नावाने अनेक माध्यमांतून प्रसिद्ध असल्याने लेखाच्या सुटसुटीतपणासाठी गरगॉयल असाच शब्द यापुढे वापरला आहे.

गरगॉयल, ग्रोटेस्क आणि याप्रकारची शिल्पे अस्तित्वात कशी आली असावीत याचा विचार करता अनेक संस्कृतींमध्ये समान आढळणारी आणि प्राचीन काळापासून चालत आलेली काही उदाहरणे येथे देता येतील.

माणसाला अनादी काळापासून त्याच्या आसपास वावरणारे प्राणी आणि त्यांच्या वर्तणूकीविषयी कमालीचे कुतूहल वाटत आले आहे. वाघाचे शौर्य, घारीची नजर, गरुडाची झेप, कोल्ह्याचे चातुर्य, लांडग्याचा लबाडपणा, सशाचे भित्रेपण यासर्वांमधून मानवी स्वभावाचे विशेष प्राण्यांना चिकटवलेले आढळतील आणि प्राण्यांचे विशेष मानवी स्वभावात उतरतात हे दर्शवलेले आढळेल. पक्ष्यांची आभाळातील भरारी पाहून माणसालाही आकाशाला गवसणी घालण्याचे स्वप्न पडले असावे ही गोष्ट जितकी सत्य आहे त्याचबरोबर, मनुष्य आणि प्राणी यांच्या संकराने चमत्कृतीपूर्ण अशी अर्धपशूमानवी व्यक्ती आणि शक्ती निर्माण करण्याचा मानवाचा मानसही पुरातन काळापासून स्पष्ट आहे.

काही पुरातन संस्कृतींचा विचार करता, ग्रीक संस्कृतीतील मिनोटॉर हा राक्षस, सापांचे केस डोक्यावर बाळगणारी मेड्युसा, भारतीय संस्कृतीतील हत्तीचे डोके चिकटवलेला गणपती, बोकडाचे डोके लावलेला दक्षराज, घोड्यांची तोंडे असणारे गंधर्व, शंकराचा नंदी, इजिप्शीयन संस्कृतीमधील कोल्ह्याचे तोंड चिकटवलेला मृत्युदेव अनुबीस, पक्ष्याचे डोके असणारा थॉथ आणि परिकथांतून समोर येणार्‍या मत्स्यकन्या, घोड्याचे धड असणारे धनुर्धर सेंटॉर, पंखधारी पर्‍या वगैरे या अर्धपशूमानवी गटात मोडतील. अगदी अर्वाचीन काळातही वटवाघळांसारखे पंख लावून फिरणारा बॅटमॅन, मनगटातून कोळ्याची जाळी काढणारा स्पायडरमॅन हे साय-फाय नायकही प्राण्यांचे गुणधर्म मानवी जीवनात अंतर्भूत करताना दिसतात आणि याच पार्श्वभूमीवर कुठेतरी चमत्कृतीपूर्ण गरगॉयल्सचीही भेट घडते. इमारतींच्या कळसांवरून तुमच्याकडे ते सतत पाहात असतात. नजर ठेवून असतात, तुमच्या लक्षात ते येवो किंवा न येवो.

चित्र २: पॅरिसमधील सुप्रसिद्ध नोत्र दाम चर्चवरील ग्रोटेस्क


एखाद्या जुन्या गॉथिक किंवा रोमन बांधणीच्या इमारतींवर भयप्रद किंवा हिंस्त्र चेहरे, अर्धपशूमानवी मुखवटे आणि शरीरे, आक्रमक आविर्भावातील पशू यांची शिल्पे तुमच्या पाहण्यात आली असावीत. युरोपमधील ऐतिहासिक इमारती, चर्चेस, न्यूयॉर्क, बॉस्टन, फिलाडेल्फिया, मुंबई अशा अनेक ठिकाणी अशी शिल्पे तुमच्या नजरेस पडतील. पडली नसतील, तर पाहून घ्या, आढळतील हे निश्चित. आकाशातून उंचावरून आपल्याकडे अशा हिडीस आकृत्या पाहात आहेत ही कल्पना मनाला हुरहुर लावणारी नक्कीच ठरावी. हॅलोवीनच्या सुमारास बाजारातही गरगॉयल्सच्या चमत्कारिक प्रतिकृती विकायला ठेवलेल्या आढळतील.

पशूंच्या आणि अर्धपशूमानवांच्या चमत्कृतीपूर्ण शिल्पांबरोबरच संपूर्ण मानवी परंतु हिडीस आणि भयप्रद स्वरूपातील गरगॉयल्सही अनेकदा इमारतींवर पाहण्यास मिळतात. एखाद्या रोमन किंवा गॉथिक बांधणीच्या इमारतींच्या कमानींवरील किंवा प्रवेशद्वारांवरील की-स्टोन्सवर असे हिडीस चेहरे सहज दृष्टीस पडतील. अशा भयप्रद चेहर्‍यांमुळे अनेकांना हे गरगॉयल्स एखाद्या सैतानी करणीचे, दुष्ट प्रवृत्तींचे प्रतिनिधी वाटतात आणि गरगॉयल्सच्या गूढपणात भर पडते. काहीजणांच्या मते वास्तुकडे सैतानी प्रवृत्तींची नजर पडू नये म्हणून त्यांना घाबरवण्यासाठी ही शिल्पे कोरलेली असतात तर काहींच्या मते शत्रूची मुंडकी प्रवेशद्वारांवर लावून विजय साजरा केला जातो. या ठिकाणी शौर्यवान विजेता राहतो असे सांगण्याची ही पद्धत असावी, इमारतीच्या मालकांचा किंवा त्यांच्या विजयांचा संबंध या शिरांशी जोडता येतो असे काहींना वाटते. भारतातही शत्रूचे शीर तोडून ते वेशीवर, किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर जनतेला दिसावे असे ठेवले जाण्याची प्रथा होती तसेच काहीसे. काही तज्ज्ञांच्या मते हल्लीच्या काळात जसे एखाद्या चेहर्‍याचे व्यंगचित्र करण्याची पद्धत आहे त्याप्रमाणेच मध्ययुगात एखादा चेहरा अशा स्वरूपात लावण्याची पद्धत असावी. त्यात भयरसाची निर्मिती नसून केवळ विनोदनिर्मितीसाठी ही शिल्पे कोरली जात असावीत. कारणे काहीही असली तरी ही शिल्पे पाहून अंगावर शहारा आल्यास किंवा भीतीची भावना मनाला चाटून गेल्यास नवल नाही.

चित्र ३: हॅलोवीनच्या सुमारास अशी गरगॉयल्स बाजारात विकायला ठेवलेली आढळतात.



गरगॉयल्सची शिल्पकला मध्ययुगात प्रसिद्ध झाली असली तरी प्राचीन काळीही अशाप्रकारच्या शिल्पांचा आणि चित्रांचा वापर होत असे हे जाणवते. पुरातन इजिप्शियन स्थापत्त्यशास्त्रातील स्फिन्क्स, ग्रीक मडक्यांवर आढळणारे अर्धपशूमानव या सारख्या शिल्प आणि चित्रांना सुमारे ३-४ हजार वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. इजिप्शियन स्फिन्क्सला ग्रीकांनी आपली पौराणिक कथा जोडून भयनिर्मितीचा प्रयत्न केलेला आहे असे सांगितले जाते. एक आद्य गरगॉयल म्हणून याकडे पाहता यावे. याचप्रमाणे जुन्या काळातील उत्कृष्ट गरगॉयल कोणते यावर अनेक तज्ज्ञांचे एकमत होते ते म्हणजे अथीनाच्या ढालीवर असणारे मेड्युसाचे शीर. ग्रीक पुराणांत मेड्युसा या राक्षसीला गॉर्गॉन असे म्हटले गेले आहे.
चित्र ४: पार्थेनॉनची प्रतिकृती असलेल्या नॅशविलमधील अथीनाची ढाल येथे पाहता येईल.
गॉरगॉन या शब्दाचा अर्थ "घशांतून मोठ्याने आवाज काढणारे (डरकाळ्या फोडणारे) " असा होतो. प्राचीन ग्रीक संस्कृतीत दुष्ट प्रवृत्तींना पळवून लावण्यासाठी अशा शिरांचा वापर केला जाई. कपडे, चिलखते, ढाली, घरे, भिंती वगैरेंवर गॉरगॉनचे शीर रंगवलेले किंवा कोरलेले आढळत असे. अलेक्झांडर द ग्रेटच्या चिलखतावरही मेड्युसाचे शीर विराजमान असल्याचे पॉम्पै येथील कलाकृतीवरून कळते.

येथे एक गंमतीदार गोष्ट आठवते ती म्हणजे मेड्युसा ही पूर्वी अतिशय रूपवान होती. तिच्यावर रागावलेल्या अथीनाने तिला शाप दिल्यावर मेड्युसा भयंकर दिसू लागली. तिचे लांबसडक केस विषारी सापांत बदलले. ती इतकी हिडीस दिसू लागली की तिला पाहून भीतीने थरथरणार्‍या मनुष्याचे रुपांतर दगडात होई, म्हणजेच भीतीने आक्रसून घेतलेल्या किंवा वेडावाकडा चेहरा झालेले एक नवे गरगॉयल अस्तित्वात येई.

पाश्चात्य जगतातून सरकून भारताकडे नजर टाकल्यास भारतीय स्थापत्यशास्त्राला हजारो वर्षांचा इतिहास आहे हे लक्षात येते. परकीय आक्रमणे, कलेवरील परकीय प्रभाव या सर्वातून भारतीय कला फुललेली आहे.

भारतातील गरगॉयल्स

मुंबईत असताना छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या इमारती समोरून तुम्ही अनेकदा गेला असाल तर वरील गरगॉयल्स तुमच्या पाहण्यात आली असतील. असे नसल्यास, यानंतर कधी जाणे झाले तर या स्थापत्यशास्त्राच्या उत्कृष्ट नमुन्यासमोर काही काळ अवश्य रेंगाळा. सुबक आणि घाटीव गरगॉयल्स इमारतीच्या माथ्यावरून तुमच्याकडेच रोखून पाहात आहेत याची प्रचीती येईल. तेथून पुढे फोर्ट विभागातील जुन्या इमारतींकडेही बघा, तिथेही गरगॉयल्स सापडण्याची शक्यता आहेच. बडोद्याच्या लक्ष्मीविलास राजमहालावरही अशाच प्रकारचे गरगॉयल्स आहेत अशी बातमी नुकतीच एका मित्रांशी बोलताना कळली. अर्थातच, हे पाश्चात्य स्थापत्यशास्त्राचे नमुने आहेत. लक्ष्मी विलास राजवाडा हा संपूर्ण पाश्चात्य धर्तीचा नसला तरी त्यावर काही पाश्चात्य धाटणीचे सोपस्कार पार पडले असावेत असे वाटते. यामुळेच अस्सल भारतीय स्थापत्यशास्त्रातील गरगॉयल्स म्हणून यांची गणना करता येणार नाहीत.

भारतातही गरगॉयलसारखी शिल्पे कोरली जात का? या प्रश्नाचे उत्तर "होय" आहे. गोमुख हे सर्वार्थाने योग्य गरगॉयल मानले तरी गरगॉयल या शब्दाचा हेतू ज्याप्रमाणे बदलला आहे त्या सदृश भय उत्पन्न करणारी शिल्पेही भारतात आढळतात. भारतातील कोरीवकामाने मढवलेल्या कोणत्याही मंदिरांकडे पाहिले तर अशा गरगॉयल सदृश मूर्ती सहज दिसून येतील. या ठिकाणी चटकन आठवलेले दोन शिल्प प्रकार म्हणजे दक्षिण भारतातील मंदिरांत आढळणारे याली आणि भारतभर सर्वत्र सहज आढळणारे कीर्तिमुख यांची माहिती पुढे दिली आहे.

शरभेश्वर (सरभ/ याली)

पुराणांतून पुढील कथा सांगितली जाते ती अशी, हिरण्यकश्यपूचा नायनाट झाल्यावरही विष्णूने घेतलेल्या नरसिंहावताराचा राग शांत होईना. नरसिंहावताराच्या रागाचा त्रास संपूर्ण जगाला होऊ लागला तेव्हा त्याचा नि:पात करण्यासाठी शिवाने सिंह, गरूड आणि मानव यांच्या संकराने बनलेला शरभेश्वर अवतार धारण केला आणि नरसिंहाशी घनघोर युद्ध केले. काही काळाने नरसिंहाला शरभेश्वराचे खरे स्वरूप कळले आणि त्याचा राग शांत झाला आणि तो शरभेश्वराचा परमभक्त बनला. यापेक्षा थोड्या वेगळ्या प्रकारे, शरभ उपनिषदात शरभाने नरसिंहाला मारून टाकले असा उल्लेख येतो.
चित्र ५: मैसूर सँडल सोपचे बोधचिन्ह असणारा शरभेश्वर


दक्षिण भारतात मंदिरांच्या खांबावर सिंह, गरूड यांच्या संकराने बनलेला अर्धपशूमानव कोरण्याची प्रथा मध्यकाळापासून प्रसिद्ध आहे. याला "याली" असे म्हटले जाते. भारतात इतरत्रही हे याली, शरभेश्वर किंवा सरभ या नावाने प्रसिद्ध आहेत. मंदिरांचे संरक्षण करणार्‍या देवता म्हणून त्यांना खांबावर कोरले जाते. सिंह-गरूड आणि मानव यांच्या संकराने दर्शवलेले पर्शियन सम्राट दरायसचे (दर्युश) चित्र, बॅबिलॉनचे पंखधारी सिंह आणि सुप्रसिद्ध इजिप्शियन स्फिन्क्स हे सर्व शरभेश्वराविषयी लिहिताना नजरेआड करवत नाही.

दिवाळीच्या दिवसांत उटण्यासारखा साबण म्हणून ज्या मैसूर सँडल सोपचा वापर केला जातो त्याचे बोधचिन्ह शरभेश्वर आहे.

चित्र ६: मदुराईमधील मंदिराच्या खांबावर कोरलेला याली






कीर्तिमुख

मध्यंतरी बिल मॉयर्स या प्रसिद्ध अमेरिकन पत्रकाराने जोसेफ कॅम्पबेल यांच्या घेतलेल्या मुलाखतींचे संकलन वाचताना शिवपुराणातील एक गोष्ट आढळली. ती काहीशी अशी -

कोण्या एका बलाढ्य राक्षसाने देवांचा पराभव करून स्वर्गावर आपले राज्य स्थापन केले आणि तेथून तो तडक कैलासावर पोहोचला आणि विजयोन्मादाच्या भरात त्याने शिवाकडे पार्वतीची मागणी केली. संतप्त शिवाने आपले तिसरे नेत्र उघडले आणि त्यातून विजेचा लोळ बाहेर पडला. त्या लोळातून पहिल्या राक्षसापेक्षाही बलवान आणि भयंकर असा दुसरा राक्षस निर्माण झाला. सिंहाचे डोके, त्यावर लांबलचक जटाधारी केस, प्रचंड शरीर असणार्‍या या राक्षसाची निर्मिती शिवाने पहिल्या राक्षसाला खाऊन टाकण्यासाठी केली होती. या राक्षसाला पाहून पहिला राक्षस थरथरा कापू लागला आणि शिवाकडे क्षमायाचना करू लागला. भोळ्या शिवाला याचनेचा अव्हेर करता येईना आणि त्याने या पहिल्या राक्षसाला क्षमा केली.

आता दुसर्‍या राक्षसाने शिवाला विचारले, "माझी निर्मिती या पहिल्या राक्षसाला खाण्यासाठी तुम्ही केलीत. मी प्रचंड भुकेला आहे. आता मी कोणाला खाऊ?" शिवाने उत्तरात म्हटले, "असं कर. तू स्वतःलाच खा." शिवाची आज्ञा शिरसावंद्य मानून या राक्षसाने प्रथम आपले पाय खाण्यास सुरूवात केली. मग पोट खाल्ले. नंतर हात खाल्ले, छाती, मान खाल्ली आणि असे करता करता केवळ डोके शिल्लक राहिले. राक्षसाच्या या आज्ञाधारकतेवर प्रसन्न झालेल्या शिवाने त्याला तेथेच थांबवले आणि वर दिला, तो असा, "यापुढे तुला जग कीर्तिमुख म्हणून ओळखेल. माझ्या मंदिराच्या प्रवेशद्वारावर तुझी स्थापना होईल. तुझ्यासमोर वाकल्याखेरीज माझे दर्शन लोकांना होणार नाही, त्यांना पुण्य प्राप्त होणार नाही."

कीर्तिमुखांची कथा पद्मपुराणातही आढळते परंतु त्यात थोडाफार बदल दिसतो. तो काहीसा असा, कीर्तिमुख हा शंकराच्या जटेतून निघालेला एक शिवगण. याला तीन तोंडे, तीन पाय, तीन शेपट्या आणि सात हात होते. शंकराच्या आज्ञेवरून याने प्रेत खाऊन दाखवले. त्याचे साहस पाहून शंकराने वर दिला की, 'तुझे स्मरण केल्याशिवाय माझे दर्शन करणार्‍याचा अध:पात होईल.'
sangameshwar - dhruv"
चित्र ७: संगमेश्वर मंदिरातील कीर्तिमुख


शंकराच्या शिवगणाची ही गोष्ट खरी मानली तरी विष्णूमंदिरातदेखील ही कीर्तिमुखे सहज दिसून येतात. वेंकटेश्वर बालाजीच्या मूर्तीवरही हे कीर्तिमुख दिसते. महाराष्ट्रातील काही शिवमंदिरांतील कीर्तिमुखे उपक्रमावरील ध्रुव या प्रकाशचित्रकारांनी मला वापरण्यासाठी दिली होती ती येथे लावत आहे. भयंकर चेहर्‍यांच्या या राक्षसांचे देवाच्या मंदिरांत स्थान गॅरगॉयल (ग्रोटेस्क) सदृशच असावे हा कयास येथे मांडता येतो.

ध्रुवने दिलेले कीर्तिमुखांचे काही फोटो येथे लावत आहे. फोटो काढण्यादरम्यान ध्रुवने निरीक्षण केले त्यात महाराष्ट्रात कीर्तिमुखे केवळ प्रवेशद्वारे किंवा कमानींवर न दिसता गर्भगृहाकडे जाणार्‍या पायर्‍यांवर, विशेषतः सर्वात वरच्या पायरीवरही दिसून येतात. वाचक्नवींनी पुरवलेल्या माहितीनुसार प्राचीन संस्कृतीत सिंह हे सामर्थ्याचे प्रतीक मानले आहे. त्यामुळे राजद्वारावर, राजाच्या आसनावर, मंदिरात गाभार्‍याच्या दरवाज्यावर, देवाच्या प्रभावळीत, उंबर्‍यावर अथवा शिखरापासी एक विक्राळ सिंहमुख(कीर्तिमुख) कोरलेले असते. अशी आकृती असलेले भवन सुरक्षित राहते अशी भावना असते. जैन आणि बौद्ध संस्कृतीतही अशाप्रकारे कीर्तिमुखे कोरण्याची प्रथा आहे.

चित्र ८: वाटेश्वर मंदिरातील एक ग्रोटेस्क



जगातील विविध संस्कृतींची तुलना करत गेल्यास त्यांच्यातील साम्यस्थळे आश्चर्यचकीत करतात. गरगॉयल्स, ग्रोटेस्क, कायमेरा, स्फिन्क्स, याली, कीर्तिमुखे ही एकमेकांशी सांस्कृतिक दुव्यांतून बांधली गेली असावीत का? या प्रश्नाचे उत्तर संस्कृतीचा तौलनिक अभ्यास करणारा अभ्यासक "होय" असेच देईल. ड्रॅगनसदृश प्राणी किंवा भयंकर दिसणारे डायनॅसोर, काळाच्या ओघात नष्ट पावलेले काही प्रचंड आकारांचे जीव हे तर या गरगॉयल्समागील प्रेरणा नसावेत. विषयाचा आणि या शिल्पांचा आवाका बराच मोठा आहे. या लेखातून या विविध शिल्पांना केवळ स्पर्श करण्याचा प्रयत्न केला आहे. एखाद्या शांत संध्याकाळी वेळ काढून या गरगॉयल्सकडे अवश्य नजर टाका, तेही तुमच्याकडे इमारतींच्या छतांवरून कुतूहलाने पाहतील याबाबत शंका नाही.

grotesque - dhruv चित्र ९: महाराष्ट्रातील एक ग्रोटेस्क





तळटीपा:

उपक्रमावरील टंकात ग्यर्गॉयल या उच्चारात शब्द लिहिणे कठिण वाटल्याने सुटसुटीत गरगॉयल या शब्दाचा वापर लेखात केला आहे.

ग्रोटेस्क या शब्दाचे मूळ ग्रोट्टो या शब्दात दडलेले आहे. अधिक माहिती येथे मिळेल.

संदर्भ, अधिक माहिती, पूरक वाचनः


  1. गरगॉयल्स

  2. नाईटमेअर्स इन द स्काय : स्टिफन किंग

  3. अबाऊट गरगॉयल्स

  4. शरभ उपनिषद

  5. कीर्तिमुख

  6. जोसेफ कॅम्पबेल अँड पावर ऑफ मिथ


  7. याखेरीज, विकिपिडीयावर अनेक संदर्भ वाचनास मिळतील.


आभारः

कीर्तिमुखांच्या चित्रांसाठी ध्रुवची आभारी आहे. संदर्भांसाठी चित्राची आभारी आहे. इतर अनेक सुचवण्यांसाठी धनंजय, वाचक्नवी, विसुनाना, तो, चित्तरंजन यांची आभारी आहे. ही सर्व मंडळी उपक्रम.ऑर्ग या संकेतस्थळाचे सदस्य आहेत.


चित्रे:


  1. चित्र १ आणि चित्र २ ही विकिपिडीयावरून घेतलेली असून चित्र ३ www.frightcatalog.com येथून घेतले आहे.

  2. चित्र क्र. ५ www.mysoresandal.co.in येथून घेतले आहे.

  3. चित्र क्र. ६ www.art-and-archaeology.com येथून घेतले आहे.

  4. ध्रुवची चित्रे त्याच्या परवानगीने लावली आहेत.

Monday, November 24, 2008

महाराष्ट्राचे वैभव: हेमाडपंती मंदिरे

प्राचीन भारतात दैवतांची भव्य देवळे बांधण्याची प्रथा गुप्त राजवटीत (इ.स.३२० ते ५५०) सुरू झाली असे मानले जाते. गुप्त कालापासून आजतागायत भारतातील विविध प्रांतात विविध धाटणीची देवळे उभी राहिल्याचे दिसून येते. स्थानिक स्थापत्यशास्त्र, शिल्पकला, कलाकुसर वगैरेंचा या देवळांच्या बांधकामावर मोठा प्रभाव दिसतो. स्थापत्यशास्त्राचे हे पुरावे तत्कालीन संस्कृतीची ओळख आणि माहिती करून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. खजुराहो, कोणार्क, हम्पी आणि चालुक्यांची बदामी येथील मंदिरे त्यांच्या स्थापत्य आणि शिल्पकामांसाठी विशेष प्रसिद्ध आहेत आणि पर्यटनस्थळेही गणली जातात।

महाराष्ट्रातही अतिशय सुंदर, घडीव आणि अप्रतिम शिल्पकामाने सजवलेली प्राचीन मंदिरे अस्तित्वात आहेत याची माहिती अनेकांना नसते. महाराष्ट्रात प्रामुख्याने दगडी बांधकामाची आणि अप्रतिम कोरीव नक्षीकामाने सजवलेली जी देवळे दिसतात ती बरेचदा हेमाडपंती या नावाने ओळखली जातात. वेरूळचे घृष्णेश्वराचे मंदिर, अंबरनाथचे शंकराचे मंदिर, नाशिकजवळील गोंदेश्वर मंदिर, गोदावरीच्या तीरावरील मंदिरे, कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराचा कळस, ज्योतिबाच्या डोंगरावरची देवळे, शिखर शिंगणापूरचा शंभू महादेव, रतनवाडीचे अमृतेश्वर मंदिर, तुळजापूरचे मंदिर, त्र्यंबकेश्वराचे मंदिर इत्यादी. हेमाडपंती पद्धतीत थोडा बदल करून सासवडचा संगमेश्वर व वटेश्वर, धावडशी येथील परशुरामाचे आणि पालीचे खंडोबाचे देऊळ इ. मंदिरे बांधली आहेत. विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांत हेमाडपंती मंदिरे आहेत. हयहैय, यादव, चालुक्य हे त
त्कालीन राजे शिवभक्त असल्याने महाराष्ट्रात हेमाडपंती बांधणीची शिवमंदिरे प्रामुख्याने दिसतात.sangameshwar


चुन्याचा दर्जा न भरता घडीव दगडांवर दगड रचून तयार केलेली वास्तू हे हेमाडपंती मंदिरांचे वैशिष्ट्य मानले जाते. बांधकाम करण्यासाठी चुना, माती न वापरल्याने या मंदिरांचे बांधकाम कोरडे आहे. दगडांवरील सुबक शिल्पकला आणि पटईची छते या मंदिरांना एक आगळे रूप प्रदान करतात. या मंदिरांची बांधकामे यादव काळात सुरू झाली असावी असा सर्वसाधारण समज दिसतो. तज्ज्ञांच्या मते यादव काळापूर्वीही अनेक वर्षे असे बांधकाम झाल्याचे आढळते. उत्तरेत कोरड्या बांधकामाची मंदिरे बांधण्याची प्रथा पूर्वापार होती आणि बदामीच्या चालुक्यांच्या काळातही अशी मंदिरे बांधली गेल्याचे सांगितले जाते. पण हे बांधकाम फार मोठ्या प्रमाणात झालेले नसावे आणि महाराष्ट्रात त्याचा प्रसार झालेला नसावा असे मानले जाते. परंतु यादव काळात आणि त्या नंतर हेमाडपंती बांधकामाचा मोठ्याप्रमाणात प्रसार झाल्याचे दिसते. याचे एक मुख्य कारण मूर्तिभंजक मुसलमानांचा महाराष्ट्राला होणारा उपद्रव हे असावे. हेमाडपंती मंदिरे पक्क्या बांधकामाची नसल्याने ही मंदिरे झटकन उभारणे शक्य होत असावे. अर्थातच, दर्जा भरून पक्के बांधकाम नसल्याने सद्यस्थितीत ज्या मंदिरांचा जीर्णोद्धार झाला नाही ती मोडकळीला आलेल्या अवस्थेत दिसतात. भूकंप, पूर, पावसाच्या मार्‍याने होणारी झीज, दगडांच्या भेगांतून पसरत जाणार्‍या झाडाझुडपांनी मंदिरांची दुर्दशा केली आहे.
Amruteshwar

यादव राजे कलाप्रेमी असल्याने हेमाडपंती धाटणीची अनेक मंदिरे या काळात निर्माण झाली. त्यांची धाटणी, शिल्पकाम, बांधकाम यांत कमालीचे साम्य आढळते आणि तरीही प्रत्येक मंदिराचे आपले स्वत:चे वेगळे वैशिष्ट्य दिसून येते. या मंदिराचे स्थापत्यकार हेमाडपंत यांच्या अभियांत्रिकी कौशल्याचे कौतुक करावे तेवढे थोडे असले तरी या युगपुरुषाबद्दल फारशी माहिती महाराष्ट्राला नाही.

हेमाडपंत

हेमाडपंत हे हेमाद्री पंडित या नावानेही ओळखले जातात. हेमाडपंतांविषयी अनेक स्थानिक लोककथा प्रसिद्ध आहेत. त्यापैकी एक अशी:

हेमाडपंतांच्या जन्माच्या वेळेस त्यांच्या आईचा बाळंतपणात मृत्यू झाला. पोरका हेमाद्री अतिशय प्रतिभावान आणि विद्वान होता. त्याने भाषा आणि विविध शास्त्रांत प्रावीण्य प्राप्त केले. वैद्यकशास्त्रात त्याचा हात धरणारा दुसरा कोणी नव्हता. असे सांगतात की रावणाचा भाऊ बिभीषण आजारी असताना हेमाद्रीने त्याची शुश्रूषा केली आणि त्याच्या बदल्यात प्रसन्न होऊन बिभीषणाने हेमाद्रीला वर मागण्यास सांगितले. लंकेच्या समृद्धीवर भाळलेल्या हेमाद्रीने लंकेसारखी मंदिरे राक्षसांकरवी आपल्या प्रदेशात बांधण्याचा वर मिळवला आणि बिभीषणाने तो आनंदाने देऊ केला. मात्र त्याने एक अट घातली. ती अशी की राक्षस फक्त एकच रात्र काम करतील. दर्जा भरून केलेले बांधकाम नसल्याने हेमाडपंतांनी एका रात्रीत सर्व मंदिरे उभी केली. या आख्यायिकेबरोबरच हेमाडपंत श्रीलंकेतून लिपी शिकून आल्याची दुसरी एक आख्यायिका ऐकायला मिळते. हीच लिपी मोडी म्हणून प्रसिद्ध झाल्याचे कळते. परंतु मोडी ही शिकस्ता या फारशी लिपीवरून अस्तित्वात आल्याचा दुसरा मतप्रवाहही दिसतो।

आख्यायिका बाजूला सारून ऐतिहासिक हेमाडपंतांचा शोध घेतला असता हेमाद्री पंडित हे यादवांच्या काळातील मुख्य प्रधान होते असे दिसून येते. यादव राजे महादेव (इ. स. १२६०-७०) आणि रामचंद्र (इ. स. १२७१-१३०९) यांच्या काळातील हे अतिशय विद्वान मंत्री असावेत. यादव साम्राज्याचे ते प्रधान, मुख्य सचिव असल्याने आणि याचबरोबर जमिनीची पाहणी करून महसूल ठरवणे, तो वसूल करणे, उत्पन्न ठरवणे इ. हेही करत असल्यामुळे त्यांना "श्रीकरणाधिप" (जमाबंदीचे प्रमुख) या पदवीनेही ओळखले जाते.

हेमाडपंतांचा जन्म द. कर्नाटकात एका ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव कामदेव होते. पुढे ते कर्नाटक सोडून महाराष्ट्रात स्थायिक झाल्याचे कळते. हेमाडपंत संस्कृत भाषेचे गाढे अभ्यासक तर होतेच, परंतु लेखक, कवी, स्थापत्यशास्त्रज्ञ आणि धन्वंतरीही होते. यादवांच्या दरबारातील एक विद्वान मुत्सद्दी म्हणून त्यांची गणना होते. धर्मशास्त्रावरील चर्तुर्वग चिंतामणी हा ग्रंथ, आयुर्वेदरसायन हे वाग्भटाच्या अष्टांगहृदय या ग्रंथावरील भाष्य, आणि इतरही अनेक साहित्यनिर्मिती त्यांनी केल्याचे सांगितले जाते. मराठी भाषेसाठी देवनागरीपूर्वी वापरण्यात येणार्‍या मोडी लिपीचा शोधही त्यांनी लावल्याचे सांगितले जाते. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे व डॉ. भांडारकरांच्या मते ही लिपी हेमाडपंत श्रीलंकेतून घेऊन आल्याचे सांगितले जाते, परंतु इतर तज्ज्ञ ते ग्राह्य मानत नाहीत।

स्थापत्यशास्त्रात हेमाडपंतांनी चुना किंवा मातीचा दर्जा न भरता मध्यम आकाराचे दगड कापून, खालच्या दगडात खड्डा करून वरील दगडाची खुंटी एका विशिष्ट कोनात खालच्या दगडाच्या खड्ड्यात बसवून घडीव वास्तू बांधण्याची कलाही प्रसिद्ध केली. हे दगड तासून त्यावर कोरलेल्या शिल्पाकृती तत्कालीन संस्कृतीचे आणि कलाविष्काराचे उत्तम नमुने आहेत. थोड्याशा परावर्तित प्रकाशातही मंदिराच्या वास्तुयोजनेतील सौंदर्य कायम ठेवल्याचे दिसते आणि संपूर्ण वास्तूच्या उंचीचा किंवा वर झेपावत जाणार्‍या स्थापत्याच्या प्रभाव पडणे हे या मंदिर रचनांचे वैशिष्ट्य मानले जाते।

अशा अनेक मंदिरांच्या निर्मितीमुळे यादव साम्राज्याच्या आधीही अस्तित्वात असणाऱ्या या स्थापत्यकलेला हेमाडपंतांच्या काळात अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले दिसते. या शैलीचे प्रसिद्ध उदाहरण म्हणून वेरूळच्या घृष्णेश्वर मंदिराचे नाव घेता येईल आणि हेमाडपंती स्थापत्याचा उत्कृष्ट नमुना म्हणून नाशिकजवळील गोन्देश्वर मंदिराचे नाव घेता येईल.

घृष्णेश्वर मंदिर

औरंगाबादजवळील दौलताबादेपासून सुमारे ११ कि. मी. अंतरावर असणारे घृष्णेश्वराचे शिवमंदिर हे बारा ज्योतिर्लिंगांतील एक महत्त्वाचे ज्योतिर्लिंग गणले जाते. लाल पाषाणात अप्रतिम कोरीव काम केलेले हे मूळ मंदिर पुरातन असून, सोळाव्या शतकात शिवाजीराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले आणि त्यानंतर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याने ते अद्यापही चांगल्या अवस्थेत आहे.DSC_1253_resize
घृष्णेश्वराचे प्राचीन मंदिर कसे अस्तित्वात आले याबद्दलही अनेक आख्यायिका प्रचलित आहेत. एका प्रसिद्ध आख्यायिकेनुसार, घृष्मा (किंवा घृष्णा) नावाची एक शिवभक्त स्त्री दरदिवशी शिवलिंग बनवून नंतर ते भक्तिभावाने शिवतीर्थात विलीन करत असे. या बाईला घरात आपल्या सवतीकडून बराच जाच होता. एके दिवशी सवतीने घृष्मेच्या मुलाला कपटाने ठार केले. दु:खाने वेडीपिशी झालेली घृष्मा शिवतीर्थावर येऊन शंकराची पूजा करून आळवू लागली आणि त्याच शिवतीर्थातून तिचा मुलगा पुनर्जीवित होऊन परतला. यावेळेस शंकराने तिथे उपस्थितांना दर्शन दिले आणि गावकऱ्यांनी शंकराचे मंदिर त्या ठिकाणी बांधले, जे घृष्णेश्वराच्या नावाने प्रसिद्ध झाले।
DSC_1256_resize

अहिल्याबाई होळकर यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा शिलालेख येथे आढळून येतो. त्यानुसार ' श्री शके १६९१ विरोधी वत्सरी माघ सुरी नाग बुध दिनी होळकर कुलाल वाल कल्पवल्ली श्री अहिल्याबाईने श्री तीर्थराज शिवालयाचा जीर्णोद्धार केला असे श्रीरस्तू शिवमाकल्पं' हे कोरलेले आढळते. आज सुमारे एक एकर क्षेत्रफळात वसलेले हे मंदिर मालोजीराजे आणि अहिल्याबाईंनी केलेल्या जीर्णोद्धारामुळे सुस्थितीत आहे. मंदिराच्या चार दिशांना चार महादरवाजे असून चौरसाकृती शिवतीर्थासभोवती अष्टतीर्थांची आठ सुंदर आणि सुबक देवालये येथे आहेत. शिवमंदिराचे गर्भगृह, अंतराळ आणि सभामंडप असे तीन मुख्य भाग असून मंदिराचा आकाशाच्या दिशेने झेपावाणारा उंच कळस आणि त्यावरील अप्रतिम कोरीव काम लक्षवेधक आहे.


गोन्देश्वर मंदिर

नाशिकपासून सुमारे २६ कि.मी. अंतरावर सिन्नर येथील गोन्देश्वराचे मंदिर हा हेमाडपंती स्थापत्यकलेचा आणखी एक उत्कृष्ट नमुना मानला जातो. मध्ययुगीन काळातील अतिशय सुंदर आणि सुबक कारागिरीचा आविष्कार म्हणून गोन्देश्वर प्रसिद्ध आहे. या मंदिराचे मूळ नाव गोविंदेश्वर असल्याचे सांगितले जाते. सुमारे सातशे वर्षांपूर्वी सिन्नरवर यादव वंशातील राजा राव गोविंद यांचे शासन होते. त्यांच्या कारकिर्दीत या मंदिराची निर्मिती झाल्याचा इतिहास कळतो. या राजावरूनच मंदिराचे नाव गोविंदेश्वर पडले असावे असा अंदाज बांधला जातो तर काही तज्ज्ञांच्या मते इ.स. ११६० मधील यादव राजा गोविंदराज याच्या नावावरून या मंदिराचे नाव गोन्देश्वर (गोविंदेश्वर) पडले असावे असाही कयास बांधला जातो. महाराष्ट्रात आढळणार्‍या मध्ययुगीन वास्तूंपैकी अत्युत्तम शिल्पकलेचा नमुना म्हणून गोन्देश्वर मंदिराची गणती होते.
या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे मंदिराची वास्तू पायर्‍या पायर्‍यांनी बनलेल्या १२५ फूट x ९५ फूट मापाच्या ओट्यावर उभी आहे. मंदिराची बांधणी अतिशय प्रमाणबद्ध आणि सममितीत असून स्थापत्य अतिशय मोहक आहे. संपूर्ण मंदिराचा परिसर सुमारे आठ हजार चौरस फुटांचा आहे. मंदिर पूर्वाभिमुख असून दक्षिणेकडूनही त्याला दरवाजा आहे.

हे मंदिर इतर हेमाडपंती मंदिरांपेक्षा किंचित वेगळे असून उत्तरेकडील नागरी मंदिरांची झाक त्यावर दिसते. हे मंदिर पाच मुख्य मंदिरांचा समूह असल्याने त्याला शैवपंचायतन म्हटले जाते. यांतील गोन्देश्वराचे मुख्य शिवमंदिर मध्यावर असून सभोवतीची चार उपदिशांना असणारी मंदिरे पार्वती, गणपती, सूर्य आणि विष्णू यांची आहेत. इतर मंदिरांपेक्षा मुख्य मंदिर थोडे उंचावर असून मंदिराचे सभामंडप आणि गर्भगृह असे भाग आहेत. गर्भगृहावर बांधलेले आकाशाकडे झेपावणारे मंदिराचे पट्टईचे शिखर अतिशय देखणे असून अप्रतिम कोरीव कामाने सजवलेले आहे. गर्भगृहात रेखीव शिवपिंडी आहे. सभामंडपातील खांब नक्षीने कोरलेले असून त्यांवर आणि मंदिरांच्या भिंतींवर देव-देवता, गंधर्व-अप्सरा, पौराणिक आणि रामायणातील प्रसंग कोरलेले आहेत. मंदिरातील शिल्पकाम त्रिमित असून त्यावर पडणार्‍या परावर्तित प्रकाशाच्या आणि सावलीच्या छटांतून मंदिराचे देखणेपण अधिकच उठावदार दिसते।

नैसर्गिक उत्पात आणि मानवी औदासिन्यातून टिकून राहिलेली ही मंदिरे काही स्थानिकांच्या आस्थेतून अद्याप सुस्थितीत आहेत. कला, शिल्प आणि स्थापत्याचा हा समृद्ध वारसा असल्याचे ध्यानात आल्यावर पुरातत्त्वखात्यानेही या मंदिरांकडे लक्ष पुरवण्यास सुरुवात केली आहे. शासनाने या स्थळांचा पर्यटन विकास केल्यास आणि स्थानिकांनी योग्य काळजी घेतल्यास सर्वांच्या अथक प्रयत्नांतून आणि श्रद्धेतून महाराष्ट्राला हेमाडपंतांनी दिलेला हा वैभवशाली वारसा टिकून राहील याची खात्री वाटते।

आभार: या लेखाला माहितीचा हातभार लावण्याबद्दल चित्तरंजन भट आणि शुद्ध मराठी यांची आभारी आहे. संगमेश्वर, अमृतेश्वर आणि घृष्णेश्वर मंदिरांची प्रकाशचित्रे उपलब्ध करून दिल्याबद्दल ध्रुव मुळे यांची आणि गोन्देश्वर मंदिराचे प्रकाशचित्र उपलब्ध करून दिल्याबद्दल पराग पुरंदरे यांची अतिशय आभारी आहे.

Thursday, May 22, 2008

भारताचे अटलांटिस

अटलांटिस या समुद्रात लुप्त झालेल्या दंतकथेतील प्रसिद्ध बेटाचा परिचय अनेकांना आहे. अटलांटिसबद्दल ठोस माहिती देणारा उल्लेख ग्रीक तत्त्ववेत्ता प्लेटोने केल्याचे आढळते. अटलांटिसच्या राज्यात अनेक सुंदर इमारती, मंदिरे उभी होती. त्यातील काही सोन्या-चांदीने मढवलेली होती. राज्यात सुबत्ता नांदत होती. लोक सुसंस्कृत आणि कलाप्रेमी होते. लाखोंचे सैन्य आणि सुसज्ज आरमार बाळगणार्‍या या प्रगत राज्याने अथेन्सवर हल्ले केल्याचे प्लेटो सांगतो परंतु अचानक एका दिवस-रात्रीत होत्याचे नव्हते होऊन अटलांटिस समुद्राच्या पोटात गडप झाल्याची नोंद येते. अटलांटिस हे खरेच राज्य होते की प्लेटोच्या सुपीक डोक्यातून निर्माण झालेली ती एक रम्य कल्पना होती याबाबत कोणी पुरावा देऊ शकत नाही. प्लेटोखेरीज अन्य कोणत्याही पुरातन नोंदीत किंवा ग्रीक दंतकथांत अटलांटिसचा उल्लेख सापडत नाही आणि अटलांटिस असे अचानक गडप होण्याचे नेमके कारण काय तेही समजत नाही परंतु तरीही अटलांटिसने संशोधकांना आजतागायत भुरळ घातली आहे. हे बेट शोधून काढण्याचे हजारो प्रयत्न झाले आहेत आणि होत राहतील.

अटलांटिसचे भौगोलिक स्थान कोणते याबाबतही अनेक प्रवाद आहेत. ग्रीसच्या जवळ भूमध्य समुद्रात, इजिप्तच्या जवळ अफ्रिकेनजीकच्या समुद्रात ते दूरवर अटलांटिक समुद्रात आणि हिंदी महासागरातही अटलांटिस असावे का काय या विचारांनी पछाडलेले अनेक हौशी संशोधक सापडतात.

समुद्राने गिळलेल्या बेटांची आणि किनार्‍यावरील शहरांची संख्या तशी बेसुमार असावी. सॅंटोरिनी, विनेटा, ओलस, अलेक्झांड्रियाचा समुद्रतटाजवळील भाग आणि अशी अनेक शहरे समुद्राने आपल्या उदरात सामावून घेतलेली आहेत. भारताचा विचार करता समुद्राने गिळलेले चटकन आठवणारे शहर म्हणजे द्वारका. महाभारताच्या १६ व्या अध्यायात द्वारकेचा विनाशकाळ जवळ आला असता विनाश कसाकाय घडत गेला याचे उल्लेख येतात. त्यापैकी काही पुढीलप्रमाणे - घरांतील भांडी अचानक फुटू लागली, रस्त्यांवर उंदीर-घुशी राजरोस फिरू लागले, शहरातील पक्षी उच्च रवात ओरडू लागले, गिधाडे शहरावर घिरट्या घालू लागली, द्वारकावासियांनी स्थलांतरास सुरुवात केली आणि बघता बघता द्वारका समुद्राच्या उदरात नाहीशी झाली इ.

महाभारतात, द्वारकेच्या अशा नाहीशा होण्याचा संबंध गांधारीचा शाप, यादवांचा शाप ते श्रीकृष्णाच्या मृत्यूशीही लावला जातो परंतु द्वारकेचेही नेमके असे का व्हावे ते कळत नाही. आज या सर्वांची कारणे समुद्राची पातळी वाढणे, किनारे खचणे, भूकंप, त्सुनामी अशी पुढे करता येतात. पूर्वापार भारताच्या पूर्व आणि पश्चिम किनार्‍यावरून व्यापार चालत असल्याच्या नोंदी मिळतात. महाराष्ट्राचे, केरळचे किनारे आणि त्यावरील बंदरे यांचे उल्लेख इतिहासात शोधल्यास सहज मिळतात. बंगालच्या महासागरातील असेच एक पुरातन बंदर तमिळनाडूतील महाबलीपुरम‌ला असल्याचे सांगितले जाते.

महाबलिपुरम्‌चे समुद्रतटावरील मंदिर



महाबलीपुरम्‌बद्दल प्रसिद्ध आख्यायिका अशी की हिरण्यकश्यपुचा नरसिंहाने वध केल्यावर प्रह्लाद गादीवर बसला. या प्रह्लादाचा मुलगा बळी किंवा महाबळी. या बळीराजाने महाबलीपुरम्‌ची स्थापना केल्याचे सांगितले जाते. ऐतिहासिक नोंदींनुसार पल्लव राज्यकाळात महाबलीपुरम्‌च्या बंदराचा विकास झाल्याचे सांगितले जाते. सातवाहनांचे राज्य खिळखिळे झाल्यावर पल्लव राजघराण्याने आपले स्वतंत्र राज्य आंध्र आणि तमिळनाडूमध्ये स्थापन केले. त्यापैकी दुसरा नरसिंहवर्मन या राजाने आठव्या शतकात महाबलीपुरम्‌ शहराचा विकास केल्याचे सांगितले जाते. या पल्लव राजांबद्दल विस्तार लेखात नंतर येईलच. या शहराबद्दल दुसरी प्रसिद्ध आख्यायिका अशी की येथे समुद्रतटापाशी सात प्रचंड मंदिरे उभी होती आणि या मंदिरांच्या सभोवताली प्रचंड राजवाडे, महाल आणि हवेल्या उभ्या होत्या. एक सुसंस्कृत राज्य येथेही नांदत होते. आज यापैकी फक्त एकच मंदिर समुद्रतटावर उभे आहे.

महाबलीपुरम् शहराबद्दल प्राचीन उल्लेख मार्को पोलोच्या नोंदीत आढळतो असे म्हणतात. हा उल्लेख महाबलीपुरमवर उल्लेखनीय प्रकाश टाकत नसला तरी मार्को पोलोच्या प्रवासाचे नकाशे पाहता तो या बंदराला भेट देऊन गेल्याचे स्पष्ट कळते. यानंतरची महत्त्वाची नोंद जॉन गोल्डींगहॅम या ब्रिटिश खगोल संशोधकाने अठराव्या शतकात केलेली आढळते. या नोंदीत तो महाबलीपुरम्‌चे मंदिर, त्याचे स्थापत्त्य, रचना या सर्वांवर भाष्य करतो. प्राचीन आख्यायिकेनुसार येथे सात मंदिरे असल्याचाही उल्लेख येतो, गोल्डींगहॅमची आख्यायिका सांगते की कोणे एके काळी या जागी एक अतिशय सुसंस्कृत शहर विकसित झाले होते. स्वर्गस्थ देवांना याचा हेवा वाटल्याने त्यांनी प्रलय निर्माण केला आणि क्षणार्धात सर्व शहर पाण्यात गडप झाले. सातपैकी सहा मंदिरे पाण्याखाली गेली आणि एक किनार्‍यावर शिल्लक राहिले. या नोंदीचा काळ सुमारे १७९८चा. या आख्यायिकेला पुष्टी देणारी घटना सुमारे १०० वर्षांनी घडली.

१८८३ मध्ये इंडोनेशियाजवळील क्राकाटोआ ज्वालामुखीचा उद्रेक होऊन प्रचंड त्सुनामी लाटा निर्माण झाल्या. या प्रलयात सुमारे ३६,००० जीव गेले आणि इंडोनेशियाजवळील काही लहान बेटे जगाच्या नकाशावरून पुसली गेली. भारताच्या किनार्‍याला नेमकी हानी कशी पोहोचली याचे तपशील मिळू शकले नाहीत परंतु पोहोचली असावी ही शक्यता फार मोठी वाटते. यानंतर १९१४ मध्ये जे. डब्ल्यू. कूम्बस या ब्रिटिश लेखकाने लिहिलेल्या आख्यायिकेत येथे बंगालच्या उपसागराकडे पाहणारी सात भव्य मंदिरे असून त्यांचे कळस तांब्याचे होते असे म्हटले आहे. हे कळस सूर्यप्रकाशात झळाळत असत आणि नाविकांना दिशा मार्गदर्शक म्हणून या कळसांचा मोठा उपयोग होत असे.

या मंदिरांचा र्‍हास नेमका कशामुळे आणि कधी झाला याची नोंद मिळत नसली तरी संशोधकांच्यामते भूकंप, त्सुनामीसारखे काहीतरी घडले असावे आणि त्यातून देवांना हेवा वाटल्याने त्यांनी हे शहर नष्ट केले ही दंतकथा जन्मली असावी. १०००-१२०० वर्षांपूर्वी येथील जमीनही समुद्रात आतवर पसरलेली असावी आणि आतापर्यंतच्या कालावधीत जमिनीची धूप होऊन समुद्र आत सरकला असावा ही दुसरी शक्यता वर्तवली जाते परंतु प्रचलीत आख्यायिकेशी ती मेळ खात नाही. ब्रिटिश राजवटीत या समुद्रकिनार्‍यावरील अनेक मूर्ती आणि स्थाने वाळूखालून साफ करून घेण्यात आली आणि पुरातत्त्वखात्याचे कामही रुजू करण्यात आले.

तरीही २००४ सालच्या त्सुनामीपूर्वी या प्राचीन शहराबद्दल आणि त्याच्या सात प्रसिद्ध मंदिरांबद्दल म्हणावे तसे पुरावे सापडत नव्हते. अनेक भारतीय आणि परदेशी संशोधकांच्यामते या सर्व भाकडकथा असण्याची शक्यता वर्तवली जात असे. परंतु, समुद्रात नाव घातल्यावर आणि कधी कधी ओहोटीच्या वेळी समुद्राखाली मानवनिर्मित बांधकाम दिसते अशा प्रकारच्या स्थानिक कोळ्यांनी सांगितलेल्या दंतकथा मात्र प्रसिद्ध राहिल्या. २००२ साली एका ब्रिटिश संस्थेसोबत नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी या भारतीय संस्थेने महाबलीपुरमच्या किनार्‍यावर संशोधन प्रकल्प राबवला. त्यात किनार्‍यापासून सुमारे ५०० मीटर अंतरावर मानवनिर्मित भिंतींसदृश बांधकाम सापडले. बांधकामाच्या रचनेवरून तेथे एकेकाळी अनेक इमारती उभ्या असाव्यात असा अंदाज बांधण्यात आला. संशोधकांनी या बांधकामाचा काळ पल्लव राज्यकाळात, अंदाजे नरसिंहवर्मनच्या काळात नेऊन ठेवला.

त्सुनामीच्या दिवशी अनेक पर्यटकांना आणि स्थानिक रहिवाशांना ओहोटीसारखी परिस्थिती निर्माण होऊन समुद्राचे पाणी अचानक शेकडो मैल आत ओढले गेल्याचे दिसले. या काळात अनेकांना पाण्याखालील बांधकामाचे दर्शन झाले. त्यानंतर आलेल्या प्रचंड लाटेने समुद्रातील काही प्राचीन अवशेष किनार्‍याकडे ढकलले गेले आणि किनार्‍याजवळील काही दुर्लक्षित बांधकामांवरील शेकडो वर्षे साचलेली वाळू धुतली गेल्याने ते नव्याने नजरेस आले.
किनार्‍यावर ढकलले गेलेले - नव्याने सापडलेले काही अवशेष


आलोक त्रिपाठी या भारतीय पुरातत्त्व खात्यातील संशोधकाची मुलाखत हल्लीच पाहण्यात आली. त्यांच्या म्हणण्यानुसार या भागातील समुद्र उथळ असल्याने बरेचदा तेथे नाव घालण्यास किंवा पाणबुड्यांना आत जाऊन चित्रण करण्यास अडचणी येतात. तरीही २००५ सालापासून केलेल्या अव्याहत प्रयत्नांतून येथे एक पुरातन शहर वसत होते यावर शिक्कामोर्तब झालेले आहे. या बांधकामात ताशीव भिंती आणि बांधकाम स्पष्ट दिसून येते आणि सध्या हे बांधकाम पल्लव राज्यकाळातीलच आहे की त्याहीपेक्षा प्राचीन आहे यावर संशोधन सुरू आहे.

पल्लव राजघराणे

लेखात वर उल्लेखल्याप्रमाणे सातवाहनांच्या पडत्या काळात पल्लव राजघराण्याचा उदय झाला आणि त्यांनी आंध्र आणि तमिळनाडू प्रदेशात आपले राज्य स्थापन केले. हे पल्लव राजे मूळचे कोणते याबाबत मात्र प्रवाद आहेत. काही संशोधकांच्या मते पर्शियातील पह्लव म्हणजेच पल्लव. स्थलांतरित होऊन ते येथे स्थायिक झाले असावेत आणि पुढे त्यांचे नाव पल्लव असे पडले असावे. या घराण्यातील बरेचसे राजे वर्मन ही उपाधी चालवत. या वर्मन उपाधीमुळे यापैकीच एखादा राजा कंबोडियात जाऊन ख्मेर घराण्याचा निर्माता ठरला असावा अशी शक्यताही वर्तवली जाते. पल्लव राजा महेंद्रवर्मन हा कला आणि स्थापत्त्य यांचा प्रेमी होता. त्याचा राजवटीत पाषाणातून कोरलेल्या सुबक आणि देखण्या मंदिरांची निर्मिती केली गेली. महाबलिपुरम्‌च्या मंदिराचा विकास किंवा निर्मिती दुसर्‍या नरसिंहवर्मनाच्या काळात झाली असे मानले जाते. हा राजाही कला, भाषा आणि स्थापत्त्यशास्त्राचा प्रेमी होता. हा राजा मल्लविद्येतही प्रवीण होता आणि त्यामुळे महाबलिपुरम्‌ला मामल्लापुरम्‌ (मामल्ला = मल्ल) या नावानेही ओळखले जाते.




महाबलिपुरम्‌चे समुद्रतटावरील मंदिर

महाबलिपुरम्‌चे समुद्रतटावरील उरलेले एकमेव मंदिर संपूर्ण पाषाणातून कोरलेले आहे. या मंदिराच्या स्थापत्त्याबद्दलही आख्यायिका सांगितली जाते की हे कोरीव काम करताना लाकूड आणि धातू यांचा वापर केला नाही. हे मंदिर एका संपूर्ण पाषाणातून कोरलेले आहे. येथे प्रमुख मंदिर विष्णूचे असून या मंदिराच्या स्थापनेनंतर महाबलिपुरम्‌चा र्‍हास थांबला अशी कथा सांगितली जाते. याचबरोबर, मोकळ्या जागेवर खडकांवर कोरलेले गंगेचे पृथ्वीवर अवतरणे, अर्जुनाची तपश्चर्या, वराहाचे मंदिर, पांडवांचे रथ हे कोरीव कामांचे उत्कृष्ट नमुने मानले जातात.

संदर्भः


चित्रे


  • मार्कोपोलोचा नकाशा : http://www.silk-road.com/maps/images/polomap.jpg

  • महाबलिपुरम् मंदिर आणि कोरीव लेणी : विकिपीडिया

  • किनार्‍यावर ढकलले गेलेले - नव्याने सापडलेले अवशेष : http://newsimg.bbc.co.uk


Sunday, November 04, 2007

द्रौपदीचा पांडवांशी विवाह - आक्षेप आणि कारणमीमांसा

मनोगतावर कर्ण या व्यक्तिरेखेवर कसा अन्याय होत गेला हे सांगणारी एक चर्चा सुरु होती. ती वाचत असता अनेकांची मतप्रदर्शने पाहण्यात आली. लहानपणापासून महाभारताच्या सांगोवांगीच्या कथा ऐकून अनेकजण त्याला आताची नैतिकता आणि कायदे लावताना दिसतात. गांगुलींचे महाभारत हीच माझ्याकडील विश्वसनीय प्रत आहे. तिच्या अनुषंगाने खालील लेख लिहिला आहे. भांडारकर इन्स्टिट्यूटमधील महाभारताची सुधारित प्रत कोणी वाचली असल्यास आणि खालील लेखावर अधिक प्रकाश टाकू शकल्यास आभारी असेन.

चर्चेतील आक्षेप काहीसे असे होते.


  • द्रौपदी ही भीक होती का?
  • पांडवांनी बैलोबांप्रमाणे आईची आज्ञा शिरसावंद्य मानून द्रौपदीला वाटून कसे घेतले?
  • कुंतीने भावांभावांत एकी रहावी म्हणून पाचांचा विवाह द्रौपदीशी करण्याचा जलद निर्णय कसा काय घेतला?
  • अनेक प्रसंगांतून द्रौपदी उर्मट होती असे दिसते तर तिने पाचांची पत्नी बनणे कसे स्वीकारले?



भिक्षा ही भिकार्‍याला दिलेली भीक नसून ब्राह्मणाची मिळकत समजली जाई. तत्कालीन स्त्रियांची सामाजिक स्थिती पाहता, स्त्रीही गोधनाप्रमाणेच पुरुषाची मिळकत असणे वावगे नसावे. आता वळू स्वयंवरपर्वाकडे - यातील स्वयंवराचा भाग सोडून, द्रौपदीला जिंकल्यावर ब्राह्मणवेशात पांडव तिला घेऊन कुंभाराच्या घरी येतात तिथपासून सुरुवात करू.

आपले पुत्र परतले नाहीत या काळजीत पाठमोऱ्या बसलेल्या कुंतीच्या समोर उभे राहून पांडव, आपण भिक्षा घेऊन आल्याचे सांगतात. 'जे काही मिळाले ते तुम्ही समान वाटून घ्या' असे कुंती सांगते आणि पुत्रांकडे वळते. समोर उभ्या असलेल्या याज्ञसेनीला पाहून कुंती चकित होते आणि तिला आपल्या चुकीचा पश्चात्ताप होतो. 'हे मी काय केले?' असे मोठ्याने बोलून ती द्रौपदीचा हात पकडते आणि पापाचे क्षालन व्हावे म्हणून युधिष्ठीरासमोर उभी राहते आणि सुनावते ' द्रुपद राजाची कन्या तुझ्या धाकट्या भावांनी जिंकून आणून माझ्यासमोर उभी केली आणि वर भिक्षा आणली असे ओरडले तो त्यांचा निव्वळ मूर्खपणा आहे. हे राजा! भिक्षा आणली असे वाटल्याने मी काही चुकीचे बोलून गेले नाही पण आता तूच सांग की माझे बोलणे खोटे कसे पडावे? आपल्या हातून पाप कसे घडू नये आणि या नवपरिणित वधूला येथे अवघडल्यासारखे कसे वाटू नये?'

युधिष्ठीर आईची समजूत घालतो आणि अर्जुनाकडे वळून म्हणतो, 'याज्ञसेनीला तू पणात जिंकलेस, तेव्हा तिच्याशी लग्न केवळ तूच करावेस. तेच योग्य होईल.'

यावर अर्जुन म्हणतो, 'असे करून पापाचा घडा माझ्या नशिबी येणार. आपण सर्व काही वाटून घ्यायची शपथ घेतली होती, मातेने तशी आज्ञाही दिली. आता याज्ञसेनीशी सर्वप्रथम विवाह तुम्ही करावा, मग भीमाने, मी, नकुल आणि सहदेवाने विवाह करावेत असे मला वाटते. यानंतर, मोठा भाऊ म्हणून आम्ही सर्व आपली आज्ञा मानू.'

अर्जुनाचे वक्तव्य ऐकून बाकीच्या पांडवांनी द्रौपदीकडे निरखून पाहिले आणि तिच्या अप्रतिम सौंदर्याकडे पाहून ती आपलीही पत्नी होऊ शकते या शिवाय कोणताही दुसरा विचार त्यांच्या मनात येईना. युधिष्टीराने हे सर्व पाहून जाणले की आपल्या भावांच्या मनात द्रौपदीविषयी लालसा निर्माण झाली आहे आणि ही गोष्ट भावांभावांत फूट पाडायला कारणीभूत होईल हे जाणून त्याने 'द्रौपदी ही पाचही पांडवांची बायको होईल' असे घोषित केले.

हे सर्व घडत असता आपल्या बहिणीला जिंकणारे हे ब्राह्मण कोण हे पाहण्यासाठी धृष्टद्युम्न कुंभाराच्या घराबाहेर लपला होता. लाक्षागृहाच्या कांडापासून नाहीसे झालेले पांडव हेच ते पाच ब्राह्मण असावेत अशी शंका आल्याने श्रीकृष्ण आणि बलराम कुंभाराच्या घरात येऊन पांडवांना भेटून सल्ला मसलत करून गेले. ती रात्र पांडवांनी आनंदात काढली. दुसऱ्या दिवशी सकाळी लपलेला धृष्टद्युम्न महालात परतला तसे द्रुपदाने उत्सुकतेने ब्राह्मणांविषयी विचारले तेव्हा धृष्टद्युम्नाने ते पांडव असल्याचा संशय व्यक्त केला. येथे द्रुपद विचारतो की त्या गरीबाच्या घरात द्रौपदी कशी राहिली आणि धृष्टद्युम्न सांगतो की अतिशय शालीन आणि मिळून मिसळून राहिली.

विवाहाची बोलणी करायला द्रुपद कुंभाराच्या घरी गेला आणि पांडवांना उत्सवासाठी आमंत्रित करून गेला. यानंतर मिरवणूक, भोजन इ. नंतर द्रुपदाने लग्नाची बोलणी सुरू केली. पांडवांनीही त्याला आपली खरी ओळख दिली आणि द्रुपदाकडे आश्रय मागितला. द्रुपद आणि पांडवांची कुरुराजघराण्यात चाललेल्या राजकारणाविषयी बोलणी झाली.

यानंतर द्रुपदाने युधिष्ठिराकडे विनंती केली की आता अर्जुन आणि द्रौपदीचा विवाह ठरावा. यावेळेस युधिष्ठिराने सांगितले की द्रौपदीशी विवाह प्रथम मी करणार. झाला प्रकार माहित नसल्याने द्रुपदाने युधिष्ठिराला म्हटले की 'द्रौपदीला अर्जुनाने जिंकले आहे. सर्वांची संमती असेल की आपण मोठे भाऊ असल्याने तिच्याशी विवाह करावा तर माझी काहीच हरकत नाही.' यावर युधिष्ठिराने त्याला घडल्या प्रकाराची कल्पना दिली. ते ऐकून द्रुपद काळजीत पडला आणि म्हणाला की 'एका पुरुषाने अनेक विवाह करणे ही आपली प्रथा आहे परंतु एका स्त्रीने अनेक पती करणे धर्मबाह्य ठरणार नाही काय? असे पाप कसे करता येईल? या प्रसंगाने तुमच्या किर्तीला काळिमा तर नाही लागणार? अशा प्रकारचे लग्न मला समाजात आणि वेदांत आढळून आलेले नाही. हे नैतिकतेच्या विरुद्ध आहे.'

युधिष्ठिर उत्तरादाखल म्हणतो, 'नैतिकता हा फार नाजूक मामला आहे. तिचा पथ सतत बदलत असतो. मी आयुष्यात कधी खोटे बोललो नाही. ज्येष्ठांचा अवमान केला नाही. आमच्या मातेने हे शब्द उच्चारले ते खोटे ठरावेत अशी तिची आणि माझी इच्छा नाही.'

यावरही द्रुपदाचे संपूर्ण समाधान झालेले दिसत नाही (असे माझे मत) तो उद्गारतो, 'हे कुंती, तू, तुझे पुत्र आणि माझा पुत्र धृष्टद्युम्न मिळून या गोष्टीवर निर्णय करा. तुम्ही कोणत्या निष्कर्षाप्रत पोहोचलात ते मला कळवा. मी विवाहाची तयारी करेन.'

द्रुपद, पांडव, कुंती आणि धृष्टद्युम्न यांचा विचारविनिमय चालला असता तेथे व्यास पोहोचले. यानंतर द्रुपद, धृष्टद्युम्न, युधिष्ठीर आणि व्यास यांच्यात मोठी चर्चा झाली. त्या चर्चेचे फलीत असे निघाले की पूर्वीही एका स्त्रीला एकाहून अधिक नवरे असल्याचे दाखले आहेत. द्रौपदीही "श्री"चा पुनर्जन्म असून ती पूर्वजन्मी पाच इंद्रांची पत्नी होती. (ती गोष्ट विस्तारभयास्तव येथे देत नाही) तिचा जन्म एका विशिष्ट हेतूने झाल्याने तिला पाचांची पत्नी होऊ देणे धर्मबाह्य नाही. आणि या चर्चांचे फलीत धर्मानुसार द्रौपदीने पांडवांशी केलेल्या विवाहात झाले.

असो. आता माझी टिप्पणीः


  • भिक्षा म्हणजे भिकार्‍याला दिलेली भीक नाही.
  • कुंतीने एक दोन मिनिटांत निर्णय घेतला नाही किंबहुना, निर्णय कुंतीचा नाही हे सहज समजते.
  • युधिष्ठिराने लंपटपणे द्रौपदी मिळावी म्हणून प्रयत्न केले किंवा भावाभावांतील एकी राहावी म्हणून प्रयत्न केले हे मानणे ज्याच्या त्याच्या समजूतीवर अवलंबून आहे. मला दोन्हींशी वावडे नाही.



राजकारणाचा विचार केला असता पांडवांची स्थिती त्यावेळी फार वाईट होती. त्यांना योग्य आश्रयदाता हवा होता आणि तो द्रुपदापेक्षा उत्तम मिळाला नसता. द्रुपदाचे आश्रित होण्यासाठी आणि त्याची कृपा आपल्यावर राहण्यासाठी द्रौपदीला जिंकणे आवश्यक होते. ते न होता, भावाभावांतच कलह उत्पन्न झाले तर गेलेले राज्य मिळणे कठिण होते आणि विनाश निश्चित होता. आईची आज्ञा न मानणे, मोठ्या भावाच्या आधी धाकट्या भावाने लग्न करणे, शब्द खोटा पाडणे इ. गोष्टीही धर्मबाह्यच ठरल्या असत्या. म्हणजेच, इथून नाहीतर तिथून पांडवांचाच दोष मानला गेला असता. द्रुपदालाही द्रोणाचार्यांचा सूड घेण्यासाठी प्रबळ मित्रांची आणि सहकार्‍यांची गरज होती. धर्मबाह्य वाटले तरी त्याने मान तुकवली असतीच. व्यासांनी तेथे येऊन धर्मचर्चा करून पांडव कोणतेही पाप करत नसल्याचा निर्वाळा दिला आणि द्रौपदीचा विवाह पाचांशी झाला.

द्रौपदी या प्रसंगात काहीच का बोलली नाही याचे एक कारण द्रौपदीला आपला जन्म कशासाठी झाला आहे याची कल्पना होती. श्रीकृष्णाच्या भेटीने हे ब्राह्मण पांडवच आहेत यावर शिक्कामोर्तब झाले. वडिलांच्या अपमानाचा बदला आणि त्यासाठीच आपला जन्म आहे आणि पांडवांशिवाय हे कार्य कोणीच करू शकत नाही हे माहित असल्याने तिने गप्प राहणे पसंत केले.

किंवा, दुसर कारण जे महाभारताबाहेरील असावे - बाईने पतिविरुद्ध बोलले की संस्कृतीचा ऱ्हास होतो अशी समजूत असल्याने कदाचित ते संवाद मूळ महाभारतात झालेल्या बदलांमध्ये काढून टाकलेले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. सूर्याचा पुत्र म्हणून तेजस्वी कर्ण आणि यज्ञज्वालेतून बाहेर आलेले धृष्टद्युम्न आणि द्रौपदी दोघेही उर्मट असल्याचे दाखले महाभारतात दिसतात. तेव्हा या सर्व प्रसंगात द्रौपदीने आपली नाराजी दाखवली नसेल असे वाटत नाही. कदाचित, तिने ती आपल्या पित्याकडे व्यक्त केली असेल किंवा भावाकडे कारण त्या दोघांच्या संवादांत चिंता, काळजी, पापाची भीती दिसून येते.

संदर्भः द महाभारता ऑफ कृष्णद्वैपायन व्यास - के. एम. गांगुली (पाने २४७ ते २५६)

Thursday, August 16, 2007

गौतमीपुत्र शातकर्णी

महाराष्ट्राला संपन्न इतिहास आहे असे बरेचदा वाचनात येते. प्रत्यक्षात शिवाजीराजांच्या पूर्वीचा महाराष्ट्राचा इतिहास फारच थोडक्यात आपल्याला शिकवला जातो किंवा फारच कमी उपलब्ध असल्याचे सांगितले जाते. राष्ट्रकूट, चालुक्य, वाकाटक, यादव आणि सातवाहन राजघराण्याविषयी त्रोटक इतिहास नजरेस पडतो. या राजघराण्यांनीही आपापल्यापरीने आपले राज्य सांभाळले आणि वाढीस नेल्याचे दिसते परंतु समग्र इतिहास सहज नजरेस पडत नाही. बरेचदा, या राजांविषयी अधिक माहिती काढायची झाल्यास पुराणांचा आधार घ्यावा लागतो. मराठी साहित्यात या राज्यांविषयी लिहिले गेले असण्याची शक्यता आहे परंतु महाजालावर समग्र लेखन दिसत नाही.

यांतील सर्व राजघराण्यांपैकी सातवाहन राजघराण्याची आठवण आपण प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या नेहमीच काढत असतो. आजही वापरात असलेली शालिवाहन शके ही दिनमान पद्धती या राज्यकाळात सुरू झाल्याचे दिसते. महाराष्ट्राच्या इतिहासात या राजघराण्याचे स्थान कोणते हे माहित करण्यासाठी काही वाचन केले त्याचा गोषवारा येथे देत आहे -

सातवाहन राजघराणे

सम्राट अशोकाच्या वेळेस सातवाहन घराणे हे त्याचे मांडलिक होते. मेगॅस्थेनिसने त्यांच्याबद्दल इंडिका या ग्रंथात लिहिल्याचे पुरावे मिळतात. त्यानुसार मेगॅस्थेनिस लिहितो, "आंध्रातील हे घराणे अतिशय प्रबळ असून त्यांच्या आधिपत्याखालील सुमारे ३० गावांना कडेकोट बांधलेले (बहुधा किल्ले) आहेत. या राजाकडे ११,००,००० चे पायदळ आणि १००० हत्ती आहेत." स्वत: अशोकाच्या राज्यकाळात सातवाहन घराणे अशोकाचे मांडलिक असल्याचे नमूद केलेले दिसते. पुढे स्वतंत्र होऊन त्यांनी राज्यस्थापना केली आणि सुमारे ५०० वर्षांहून अधिक राज्य केले. या राजघराण्याची सत्ता आंध्रमधून गोदावरीच्या खोर्‍यात आणि पुढे महाराष्ट्रात आतपर्यंत वाढत गेली.

सातवाहन राज्य



अधिक माहितीसाठी विकिपीडियाचा हा दुवा पाहावा. याच दुव्यात पुढे या राजघराण्याचा उल्लेख कोणकोणत्या पुराणांत आला आहे त्याची उदाहरणे दिसतात. या राजघराण्यातील महत्त्वांच्या राजांपैकी गौतमीपुत्र शातकर्णी एक महत्त्वाचा राजा मानला जातो.



गौतमीपुत्र शातकर्णी (उर्फ शालिवाहन) (राज्यकाळ: इ.स. ७८-१०६) हा सातवाहन घराण्यातील २३ वा राजा मानला जातो. .

गौतमीपुत्र शातकर्णीच्या आधीही याच नावाचा एक राजा या कुळात होऊन गेला होता. त्याने ५० वर्षांहून अधिक काळ राज्य केल्याचे सांगितले जाते. त्याच्या राज्यकाळात त्याने दोन अश्वमेध यज्ञ पार पाडून राज्याची घडी बसवली. परंतु गौतमीपुत्र शातकर्णी गादीवर बसला तेव्हा सातवाहन राज्यात शक, यवन, पल्लव यांच्या हल्ल्यांमुळे अशांतता नांदत होती. गौतमीपुत्र शातकर्णीने या सर्व टोळ्यांचे पारिपत्य करून राज्यात सुव्यवस्था स्थापन केली.

अपरांत, अनूप, सौराष्ट्र, कुरुक, अकारा आणि अवंती अशा अनेक राज्यांवर त्याने आपली सत्ता प्रस्थापित केली. नहपान या राजाचा पराभव करून त्याने विदर्भावर आपले राज्य प्रस्थापित केले आणि दक्षिणेकडेही सत्ताविस्तार केला. कांचीपर्यंत त्याची सत्ता असल्याचे सांगितले जाते. प्रतिष्ठान किंवा पैठण हे प्राचीन नगर त्याच्या राज्याची राजधानी होते. त्याच्या राज्यविस्ताराचे वर्णन केले जाते की त्याच्या घोड्यांनी तीन समुद्रांचे पाणी प्यायले होते.

आपल्या राज्यकाळात त्याने अनेक नाणी पाडली. त्यापैकी काही नाण्यांवर शातकर्णीचा चेहरा दिसतो. नाहपण राजाच्या पराभवानंतर शातकर्णीने नाहपणाची सर्व नाणी ताब्यात घेऊन त्यावर आपल्या शिक्क्यांचे मुद्रण केले. आपल्या प्रजेला तो पित्यासमान वागवत होता असे वाचायला मिळते. राजा म्हणून धर्म, राजकारण, अर्थकारण या सर्व बाबतीत तो कोठेही कमी पडला नाही असे सांगण्यात येते. युद्धशास्त्रात तो प्रवीण होता आणि एक अत्युत्तम धनुर्धारी मानला जाई. याचबरोबर असेही सांगितले जाते की त्याने आपल्या राज्यात जातिव्यवस्था कडक केली आणि धर्माचे, ब्राह्मणांचे संरक्षण होईल याकडे जातीने लक्ष पुरवले.

शातकर्णीचा चेहरा असलेली नाणी


गौतमीपुत्र शातकर्णीने उज्जैनीचा राजा विक्रमादित्य (सुप्रसिद्ध विक्रम-वेताळ आणि सिंहासन बत्तिशीचा नायक) याचा पराभव करून दिनमान पद्धती रूढ केली. ही पद्धत हिंदू कालगणना म्हणून आजही महाराष्ट्र, आंध्र, गुजराथ आणि पार कंबोडियातील बौद्धांमध्येही वापरली जाते. शातकर्णी गादीवर बसल्यावर म्हणजेच इ.स. नंतर ७८ वर्षांनी ही कालगणना सुरू झाल्याने ग्रेगरीयन कॅलेंडरपेक्षा ७८ वर्षे उशीराने सुरू होते.

या राजाबद्दल नाशिक येथे खुद्द त्याची आई गौतमीच्या सांगण्यावरून आपल्या मुलाची स्तुती करणारा शिलालेख कोरलेला आढळतो, त्याचा स्वैर अनुवाद पुढीलप्रमाणे --

"क्षत्रियांचा (त्याकाळचे इतर राजे, राजघराणी) गर्व आणि अभिमान यांचा नि:पात करणारा, शक, यवन आणि पल्लव यांचा सर्वनाश करणारा, क्षहरात (KShaharat) घराण्याचा पराभव करून सातवाहन घराण्याची उज्ज्वल परंपरा पुन:स्थापित करणारा....."

मराठी विकिपीडियावर मला या राजाची कथा सांगणारा एक भाग मिळाला. तो येथे चिकटवत आहे..

शालिवाहनाची राजधानी (आणि इतर सातवाहन राजांची राजधानी) पैठण होती. शालिवाहनाने दक्षिणेत आपले साम्राज्य वसवले आणि स्वत:ला सार्वभौम राजा घोषित केले. ह्यावर उत्तरेकडील तत्कालीन राजांनी हशा उडवला आणि शालिवाहनाला आवाहन म्हणून एक हत्ती भेट म्हणून पाठवला. त्याबरोबर निरोप पाठवला की शककर्ता व्हायचे सामर्थ्य असेल तर ह्या हत्तीचे वजन किती हे नक्की सांगता येईल का? ह्यावर शालिवाहनाच्या पंडितांनी उपाय असा काढला कि पैठणच्या नागघाटावर गोदावरी नदीत एक नाव सोडली. मग हत्तीला नावेत चढवले आणि पाणि नांवेच्या बाजूवर किती चढते आहे ह्याची खूण केली. त्यानंतर हत्तीला बाहेर काढून त्याजागी माती भरली बरोब्बर त्या खुणेपर्यंत पाणी चढेपर्यंत. मग त्या मातीचे वजन केले व तो हत्ती वजनासकट परत पाठवला. ह्या त्याच्या बौद्धिक विजयाने त्यानी सुरु केलेला शालिवाहन शक सर्वांच्या व्यवहारात मान्य झाला.



उपक्रमावरील एका सदस्यांनी मला सातवाहन घराण्याची संपूर्ण वंशावळ काढून दिली होती. ती ही येथे चिकटवत आहे.

आंध्र वंशातले राजे आणि त्यांचा अंदाजे कार्यकाल(वर्षे) असा:

  1. सिमुक(सिंधुक, शिप्रक) २३
  2. कृष्ण(भात) १०
  3. श्रीशातकर्णी(श्रीमल्‍लकर्णी) १०
  4. पूर्णोत्संग(पौर्णमास) १८
  5. स्कंधस्तंभ १८
  6. शातकर्णी(शांतकर्णी, सातकर्णी) ५६
  7. लंबोदर १८
  8. आपीतक(आपीलक, दिविलक) १२
  9. मेघस्वाति १८
  10. स्वाति(पतुमत्, अटमान्) १८
  11. स्कंदस्वाति ७
  12. मृगेंद्रस्वातिकर्ण ३
  13. कुंतलस्वातिकर्ण ८
  14. स्वातिवर्ण १
  15. पुलोमावी ३६
  16. अरिष्टकर्ण(अनिष्टकर्ण) २५
  17. हाल ५
  18. मंतलक(पत्तलक, मंदुलक) ७
  19. पुरिकषेण(प्रविल्‍लसेन, पुरीषभीरु) २१
  20. सुंदरशातकर्णी(सुनंदन) १
  21. चकोरशातकर्णी ६ महिने
  22. शिवस्वाति २८
  23. गौतमीपुत्र शातकर्णी(गौतमीपुत्र) २८
  24. पुलोमत् २८
  25. शातकर्णी(शिवशातकर्णी) २९
  26. शिवश्री ७
  27. शिवस्कंध ३
  28. यज्ञश्री शातकर्णी २९
  29. विजय ६
  30. चंडश्री १०
  31. पुलोमत् ७.

संदर्भ: सर्व संदर्भ आणि चित्रे विकिपीडियावरून घेतली आहेत. याशिवाय, मेगॅस्थेनिसचा इंडिका हा ग्रंथ, महाराष्ट्र शासनाचे अधिकृत संकेतस्थळ यावरूनही ही माहिती दिली आहे.

अधिक माहितीसाठी ही चर्चा पाहावी.