Thursday, October 26, 2006

जगातील सर्वात मोठे हिंदू मंदिर

इ. स. १८६० साली एक फ्रेंच संशोधक (Henri Mahout) कंबोडियाच्या मध्यभागी असणार्‍या टोन्ले सॅप सरोवराच्या जवळपास जंगलात पदभ्रमण करत असता त्याला एका भव्य अशा प्राचीन वास्तूचे भग्नावशेष दिसले. त्याबद्दल त्याने जे लिहिले त्यातील काही विशेष वाक्यांचा स्वैरानुवाद येथे देत आहे...


"...ही वास्तू उभारताना लागलेले अपार कष्ट आणि कारागिरी पाहिली की मन कौतुकाने उचंबळून येते आणि एक प्रश्न मनात आल्याशिवाय राहत नाही... या भव्य वास्तूची निर्मिती करणार्‍या त्या महान आणि शक्तिमान संस्कृतीचे पुढे झाले तरी काय?..."


arial veiw


हे वर्णन कंबोडियातील प्राचीन हिंदू मंदिर 'एंगकोर वट'चे आहे. अप्रतिम स्थापत्यशास्त्र आणि भव्य शिल्पकलांचा नमुना म्हणून ओळखले जाणारे एंगकोर वट हे मध्ययुगात 'व्रह विष्णुलोक' (गृह विष्णुलोक?) म्हणून ओळखले जाई.


Angkor Wat


इतिहास:


कंबोडियाच्या मध्यभागी असणाऱ्या एंगकोर या प्राचीन ख्मेर राजधानीच्या भग्नावशेषांत एंगकोर वटचे मंदिर आजही उठून दिसते. संस्कृत "नगर" या शब्दाचे अपभ्रष्ट ख्मेर रूप "नोकोर"वरून नंतर "एंगकोर"ची व्युत्पत्ती झाली व "वाटिका" या शब्दापासून "वट" या शब्दाची निर्मिती झाली असा इतिहास वाचण्यास मिळतो. हिंदू व बौद्ध स्थापत्यशास्त्रांचा उपयोग करून बांधलेले एंगकोर वट हे भगवान विष्णूंचे जगातील सर्वात मोठे मंदिर समजले जाते. या मंदिराची निर्मिती भारतीय खगोलशास्त्राचे नियम वापरून करण्यात आली आहे असे सांगितले जाते.


ख्मेर राज्यकर्ता यशोवर्मन पहिला याने सुमारे इ. स. ८८९च्या काळात टोन्ले सॅप सरोवराच्या उत्तरेला यशोधरापुर नावाची आपली राजधानी स्थापन केली. या नगराच्या सभोवती त्याने खंदक खोदून नगराला सुरक्षित बनवले. कालांतराने या शहरालाच एंगकोर म्हटले जाऊ लागले. यशोवर्मननंतरच्या सर्व राजांनी आपापल्या परीने या नगरात बांधकाम करून त्याची शोभा वाढवली. एंगकोर वटची स्थापना सूर्यवर्मन दुसरा (राज्यकाळ: इ. स. १११३- ११४५) याच्या काळात सुरू झाली. सूर्यवर्मनचा राज्यकाळ तसा धामधुमीचा गेला, तरीही सुमारे ३७ वर्षे हे बांधकाम अखंडित चालले. राजा सूर्यवर्मनच्या मृत्यूनंतर हे काम सततच्या युद्धांमुळे व आक्रमणांमुळे थांबून राहिले. पुढे जयवर्मन सातवा (राज्यकाळ: इ. स. ११८१- १२१९) याच्या काळात बांधकाम पुन्हा रुजू करण्यात आले. परंतु या वेळेपर्यंत कंबोडियात थेरवाद बौद्धधर्माचा प्रसार झाल्याने बांधकामात बौद्ध स्थापत्यशास्त्राचा प्रभाव आढळतो.


मंदिराचे बांधकाम:


एंगकोर वटचे मंदिर सर्व बाजूंनी पाण्याच्या खंदकांनी वेढलेले असल्याने कालांतराने या भागांत चहूबाजूंनी जंगल वाढले तरीही ते फारशी पडझड न होता सुरक्षित राहिले. संपूर्ण जगात स्थापत्यशास्त्राचा अप्रतिम नमुना म्हणून गणल्या गेलेल्या या मंदिराच्या बांधकामात हिंदू आणि बौद्ध शिल्पकलांचा सुरेख संगम झाला आहे.


Angkor Wat model


हे मंदिर पश्चिमाभिमुख असून त्यातील मुख्य देवालय हिंदू पुराणातील मेरू पर्वताची प्रतिकृती मानले जाते. या स्थानाची लांबीरुंदी १५०० मीटर x १३०० मीटर असून ते जमीनीच्या तीन स्तरांवर (वेगवेगळ्या उंचीच्या तीन प्रांगणांत) बांधलेले आहे. मुख्य मंदिराच्या सभोवती पाच गोपुरांच्या शिल्पकलेने सुशोभित अशा सुरेख भिंती आहेत. या भिंती मेरूपर्वताला घातलेल्या वासुकीच्या विळख्याचे प्रतीक समजल्या जातात. गोपुरांच्या बुरुजांवर ब्रह्मदेवाचे मुख कोरलेले असून पायाजवळ कोरलेले त्रिमुखी हत्ती प्रत्येक सोंडेत कमलपुष्प धरून प्रवेशद्वारांची शोभा वाढवतात. मुख्य देवळापासून चौथ्या भिंतीसभोवती खणलेल्या खंदकाला क्षीरसागराचे प्रतीक समजतात. मंदिराची सर्वात बाहेरील भिंत ४.५ मीटर उंचीची असून पश्चिम दिशेकडून तिच्या पुढयातील सुमारे २०० मीटर लांबीच्या खंदकाला सुमारे ३५० मीटर लांबीच्या आणि १२ मीटर रुंदीच्या काजवाटेने (causeway) जमिनीशी जोडलेले आहे. पूर्वेकडूनही अशीच कच्ची काजवाट असून ती पूर्वी बांधकामाचे दगड वाहून नेण्यास व इतर वाहतुकीसाठी वापरली जात असावी.


हे संपूर्ण मंदिर वालुकाश्माच्या (sandstone) प्रस्तरापासून बनवले असून हे पत्थर अनेक मैल दूर असलेल्या खाणीतून कोरून मंदिराच्या जागी आणल्याचा पुरावा मिळतो. मंदिराचे बांधकाम व कलाकुसर पाहून हजारो गुलामांची, विशारदांची व कारागिरांची फौज या कामी लागली असावी असा अंदाज बांधता येतो.


मंदिराच्या भिंतींवर व गोपुरांवर अनेक देवतांच्या व अप्सरांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. या गोपुरांना "हत्ती दरवाजे" असेही म्हटले जाते कारण हे दरवाजे हत्तींची सहज ये-जा होण्याइतपत मोठे आहेत. ही गोपुरे ओलांडून आतील प्रांगणात आले असता सर्वप्रथम मुख्य मार्गाच्या उभय बाजूस दोन लहान इमारती आढळतात. त्यांना ग्रंथालये असे म्हटले जाते. यांचा उपयोग नक्की कशासाठी होत असावा याबद्दल शंका असली तरी पुरोहितवर्गाने एकत्र बसून पठण करण्याचे ते स्थान असावे असे समजले जाते. या ग्रंथालयांच्या भिंतीवर प्राचीन ख्मेर भाषेत कोरलेले शिलालेख आढळून येतात. यांत रामायण महाभारतातील संस्कृत श्लोक उद्धृत केलेले आहेत.


Gopure


हे मंदिर पश्चिमाभिमुख असण्याचे एक कारण असे सांगितले जाते की राजा सूर्यवर्मन याने आपले मृत्यूपश्चात आपले स्मारक राहावे या हेतूने मंदिराची स्थापना केली. या कारणास्तव या मंदिराला 'पिरॅमिड टेंपल' असेही संबोधले जाते. तसेच वैकुंठाला जाणारा मार्ग पश्चिमेकडे आहे असे मानल्याने या देवळाचे प्रमुख प्रवेशद्वार हे इतर हिंदू देवळांप्रमाणे पूर्वेला नसून पश्चिमेला बांधलेले आहे. काही तज्ज्ञांचा या संकल्पनेस विरोध आहे कारण अशी मंदिरे बांधण्याची प्रथा हिंदू धर्मात इतरत्र दिसून येत नाही तर भारतात काही मंदिरे पश्चिमाभिमुख आढळतात.


King Suryavaraman's procession


या स्थानाच्या तिसर्‍या आणि सर्वात उंचावरील प्रांगणात पाच मुख्य मंदिरे आहेत. त्यातील मध्यावरील प्रमुख मंदिरात पोहोचण्यासाठी तीन आयताकृती सज्जे पार करावे लागतात. प्रत्येक सज्जाच्या भिंतींवर व खांबांवर सुरेख कोरीव नक्षीकाम (bas-relief) केलेले आहे. सर्वात बाहेरील सज्जावर रामायण व महाभारतातल्या अनेक प्रसंग कोरलेले आहेत. यांत राम-रावण यांच्यातील युद्ध तसेच कौरव-पांडव युद्ध यांचा समावेश आहे. दक्षिणेकडील सज्जावर राजा सूर्यवर्मनची मिरवणूक जाताना कोरली आहे तर पूर्वेकडील सज्जावर देव व असुर यांच्यातील मेरूपर्वताच्या साहाय्याने क्षीरसागर घुसळण्याच्या समुद्रमंथनाचा प्रसंग कोरलेला आहे. याखेरीज भगवान विष्णूंनी केलेला असुरांचा पराभव, श्रीकृष्णाने केलेला बाणासुराचा वध अशी अनेक रेखीव शिल्पे कोरलेली आहेत. बौद्धकाळात निर्मिलेल्या एका सज्जात भगवान बुद्धांच्या अनेक मूर्तीही आढळतात.


gallery


या भिंती ओलांडून आत आले की पायऱ्या चढून मुख्य मंदिराकडे जाता येते. येथे पुन्हा एकदा मार्गाच्या उभय बाजूंस ग्रंथालये आढळतात. त्यानंतर पाच मुख्य देवळांचा समूह (quincunx – 'फाशावरील पाचाचा आकडा') दिसतो. कोणत्याही मंगलस्थानी चार दिशांना चार स्तंभ किंवा इमारती उभ्या करून चतु:सीमा निश्चित करणे व मध्यभागी असणाऱ्या वास्तूला/ इमारतीला संरक्षण देणे किंवा तिचे महत्त्व वाढवणे ही वैदिक परंपरा आहे. (उदा. सत्यनारायणाच्या पूजेतील चार खांब व मध्यभागी कलश) या मंदिरांची बांधणीही त्यानुसारच झाल्याचे दिसते. या पाचही मंदिरांतील मध्यावरील मंदिराचा कळस सर्वात उंच असून ते मेरूपर्वताचे प्रतीक समजले जाते. सर्व मंदिरांच्या भिंतींवर अतिशय नाजूक कोरीव काम केलेले आहे. या भिंतींवर प्रामुख्याने देवदेवतांच्या सुबक प्रतिमा कोरलेल्या आहेत. मुख्य मंदिरात पूर्वी भगवान विष्णूंची मूर्ती होती, परंतु बौद्धधर्म स्वीकारल्यावर ती मूर्ती बदलून त्या स्थानी आता बुद्धाच्या मूर्ती आढळतात.


एंगकोर शहरांत एंगकोर वट शिवाय तत्कालीन ख्मेर राजांनी बांधलेली अनेक रेखीव मंदिरे आहेत. राजा हा देवाचा अंश असल्याने देवाची सेवा, प्रार्थना व कर्मकांड याला या समाजात फार महत्त्व असल्याचे दिसते. यांतून देवाशी, राजाशी आणि त्यायोगे राज्याशी एकरूपता व एकसंधता साधण्यास फार मोठी मदत झाली असावी असे वाटते. ख्मेर घराण्याच्या शेकडो वर्षे चाललेल्या राज्यकारभाराला या मंदिरांनी फार मोठा हातभार लावला असावा.


हे मंदिर पुनश्च उभारताना जयवर्मन सातवा याचे शब्द मंदिरातील एका शिलालेखावर आढळतात, "माझ्या या चांगल्या कार्याचा उपयोग, जीवनाच्या भवसागरात तरून जाण्याची धडपड करणाऱ्या जनसमुदायाला प्रसादाप्रमाणे होवो आणि त्यांना मोक्ष प्राप्त होवो."


****


संदर्भसूची:




सर्व चित्रे विकिपीडिया व हिंदूविस्डम.इन्फो यांच्या सौजन्याने घेतली असून त्यावर टिचकी मारली असता ती मोठ्या आकारांत पाहता येतील.


Friday, September 08, 2006

कंबोडीयाचे हिंदू साम्राज्य (भारताची एक प्राचीन वसाहत)

हिंदू धर्म हा जरी जगातला एक पुरातन धर्म समजला गेला तरी इतर धर्मांसारखा या धर्माचा प्रसार मात्र भारताबाहेर फारसा झाला नसल्याचे अनेकदा ऐकू येते. त्यामानाने हिंदू धर्माची एक उपशाखा मानावी अशा बौद्ध धर्माचा प्रसार मात्र दूरपर्यंत झालेला दिसतो. हिंदू धर्म खरंच भारताबाहेर गेला की काय याचा विचार केला असता उत्तर 'तसा तो भारताबाहेरही पसरला' असे येते. हिंदू धर्म एके काळी पूर्वेकडील देशांत पसरला होता, समृद्धीस आणि भरभराटीस आला होता असे दिसून येते. यावर वाचनात आलेला वाल्मीकी रामायणातील एक संस्कृत श्लोक पुढे उद्धृत केला आहे.

यत्नवन्तो यव द्वीपम सप्त राज्य उपशोभितम ।
सुवर्ण रूप्यकम द्वीपम सुवर्ण आकर मण्डितम ॥ ४-४०-३०

किष्किंधा कांडात सुग्रीव वानरांना पूर्व दिशेस जाऊन सीतेचा शोध घेण्यास सांगतो, त्यावेळेस नक्की कुठल्या ठीकाणी शोध घ्यावा याची माहिती तो वरील श्लोकात देतो. यव द्वीप हे जावा बेटाचे आणि त्या भोवतीच्या इतर बेट समूहाचे वर्णन आहे असे काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. म्हणजेच वाल्मीकींना ज्याअर्थी यव द्वीपाची माहिती होती त्याअर्थी त्याकाळी या भूभागाशी भारताचे संबंध असले पाहिजेत.

पूर्वेकडच्या अशा देशांत प्राचीन हिंदू संस्कृतीचे अवशेष मोठ्या प्रमाणात आढळतात त्यातला एक महत्त्वाचा देश म्हणजे कंबोडीया. कंबोडीयाचा नजिकच्या काळातला इतिहास ख्मेर रक्तक्रांती आणि हुकूमशहा पोल पॉटच्या बाबतीत वाचायला मिळतो. प्राचीन इतिहास वाचण्याच्या उद्देशाने मी कंबोडीया, ख्मेर राज्यकर्ते व एंगकोर वट यावर जे थोडे बहुत वाचन केले त्याचे संकलन या लेखाद्वारे करत आहे.

इसवी सनापूर्वी सुमारे २००० वर्षांच्या दरम्यान मुख्यत्वे भातशेतीची लागवड करण्यासाठी सुपीक जमीनींचा शोध सुरू झाला. यातूनच भारताच्या मुख्य भूमीवरून हळूहळू पूर्वेकडे स्थलांतर होऊ लागले. सुरुवातीच्या काळात स्थलांतरीतांनी स्वत:ची स्वतंत्र खेडी स्थापन करण्यास प्रारंभ केला. याच बरोबर भारत आणि चीन यांच्या दरम्यान होणाऱ्या व्यापारामुळे हा भूभाग हळूहळू माणसांनी आणि भारतीय संस्कृतीने व्यापला गेला. यालाच या भूभागाचे हिंदुत्वीकरण (इंडिअनायझेशन) म्हणून ओळखले जाते. खऱ्या अर्थाने हिंदुत्वीकरणाचा काळ इसवी सना पूर्वी ५०० (२००?) वर्षे मानला जातो. सर्वात जुनी संस्कृती कंबोडियन समुद्राच्या बंदरावर तसेच मेकॉन्ग नदीच्या खोऱ्यात आणि टोन्ले सॅप सरोवराजवळ उदयास आली. भारत- चीन यांच्या व्यापारामुळे वृद्धिंगत होणाऱ्या या संस्कृतीत हळू हळू हिंदू ब्राह्मण, बौद्ध भिक्षू, अन्य विद्वान, कारागीर, कलावंत यांची ये जा ही सुरू झाली. कंभोज (कंबुजा) राजघराण्याच्या उदया विषयी एक आख्यायिका प्रसिद्ध आहे ती पुढील प्रमाणे --

कंभोज देशाचा ब्राह्मण राजपुत्र कौंडिण्य स्वयंभू (कम्बु स्वयंभूव: कंबोडियामधे) समुद्रमार्गाने (सौराष्ट्रातील बंदरातून प्रवास सुरू करून) मजल दरमजल करत अतिपूर्वेला पोहोचला. तिथे त्याची नजरभेट ड्रॅगन राजाची (नाग वंश?) मुलगी मीरा (Mera) हीच्याशी झाली आणि तो तिच्यावर भाळला. ड्रॅगन राजा एका पाणथळ प्रदेशावर राज्य करत होता. एक दिवस राजकन्या आपल्या नौकेतून विहारासाठी जात असता कौंडिण्याने तिच्यावर मायावी बाण मारला, जेणे करून राजकन्या त्याच्या प्रेमात पडली. आपल्या जावयाला भेट म्हणून ड्रॅगन राजाने या पाणथळ जागेतले सर्व पाणी पिऊन टाकले आणि तो भूभाग कौंडिण्याला राज्य करण्यास भेट दिला. या नव्या राज्याचे नाव पडले कंबुजा आणि कम्बु व मीरा यांच्या नावांच्या संकरातून या राजघराण्याला ख्मेर हे नाव पडले.

या राज्याला पुढे फुनानचे राज्य म्ह्टले जाऊ लागले. कालांतराने या भागात लहान मोठी बरीच हिंदू राज्ये वसली गेली. त्यापैकी चेन्लाचे (झेन्ला: चीनी उच्चार) त्यामानाने प्रबळ राष्ट्र बराच काळ फुनानचे मांडलिक होते पण पुढे जाऊन चेन्लाने फुनानवर स्वारी करून ते राज्य आपल्या अंकित केले.

फुनान: (इ. स. नंतर पहिले शतक - इ.स. नंतर ६१३) फुनानच्या शासकांनी भारतामधून बऱ्याच ब्राह्मणांना फुनानच्या राज्यात स्थलांतर करण्यास उद्युक्त केले असा उल्लेख वाचण्यास मिळतो. या ब्राह्मणांनी राज्यशासन, राज्य नियंत्रण व कलेच्या क्षेत्रात फुनानच्या शासकांना बहुमोल मदत केली. उत्खननातील काही पुरावे व अवकाशातील छायाचित्रांच्या साहाय्याने या काळात कालवे काढून शेती केली जात होती असे दिसून येते. कंबोडीयाच्या बंदरावरून होणारा व्यापारही या काळात फुलून आला.

या राज्याची बरीचशी माहीती प्राचीन चिनी दस्तावैजांमधे मिळते. त्यामानाने प्रत्यक्ष कंबोडीया मधे ती फारशी उपलब्ध नाही.

चेन्ला: (इ. स. नंतर ५५० - सुमारे ८ वे शतक) चेन्लाचा सर्वप्रथम उल्लेख चिनी दस्तावैजात फुनानचे मांडलिक राज्य म्हणून आढळतो. इ.स.नंतर ५५० ला चेन्ला राज्य फुनान पासून वेगळे होऊन स्वतंत्र झाले. त्यानंतर ६० वर्षांत त्यांनी फुनान बळकावले. इशानपुरा ही चेन्ला राज्याची पहिली राजधानी मानली जाते. या शासकांनीही हिंदू संस्कृतीचा अंगिकार केला. पुढे या राज्याचे अनेक तुकडे पडून एक छत्री अंमल नाहीसा झाला.

जावा साम्राज्य: (८ वे शतक) खिळखिळ्या झालेल्या चेन्ला राज्यावर समुद्रापलीकडच्या जावा साम्राज्याने स्वाऱ्या करून त्याला अधिकच लुटले. जावा साम्राज्याशी दोन हात करायला असमर्थ असल्याने चेन्ला राज्यांची समुद्रतटांवरून पीछेहाट झाली व ते कंबोडीयाच्या अंतर्भागातील टोन्ला सॅप या सरोवराच्या आसपास जाऊन वसले.

एंगकोर साम्राज्य (इ.स.८०२- इ.स.१४३१): जयवर्मन दुसरा या चेन्ला राज्याच्या एका शासनकर्त्याला जावा साम्राज्यात बंदी ठेवले होते. बंदिवासातील सुटके नंतर त्याने सैन्याची जमवाजमव करून इ. स. ७९० पासून पुढे १२ वर्षे जावा साम्राज्याशी निकराने लढा दिला. इ.स. ८०२ मध्ये त्याने स्वत:चा राज्याभिषेक करून घेतला आणि अशा प्रकारे ख्मेर घराण्याचा आणि एंगकोर राजवटीच्या सुवर्ण काळाचा आरंभ झाला. आपल्या राज्यकाळात त्याने कंबोडीयाच्या अनेक प्रांतांवर स्वाऱ्या करून आपला राज्य विस्तार केला आणि एकछत्री अंमल प्रस्थापित केला. याबरोबरच त्याने "देवराजा" ही महत्त्वाची प्रथा सुरू केली. राजा हा ईश्वरी अंश असतो, ही हिंदू संकल्पना त्याने प्रत्यक्ष अमलात आणली. निर्विवाद वर्चस्व आणि आधिपत्य स्थापन करून एंगकोर साम्राज्याची पाळेमुळे कंबोडीयात घट्ट रोवण्यास या प्रथेचा फार मोठा उपयोग झाला. इतिहासावरून दिसून येतं की जयवर्मन आणि त्यानंतरच्या पुढील देवराजांच्या मागे सर्व प्रजा एकजूटीने उभी राहिली आणि एका बळकट साम्राज्य निर्माण झाले. एंगकोरचे साम्राज्य सुमारे ६०० वर्षे टिकले.

बऱ्याचशा ख्मेर राजांच्या नावामागे लावली जाणारी "वर्मन" ही उपाधी रक्षणकर्ता या अर्थाने वापरली जाते.

याच वंशातील सूर्यवर्मन दुसरा (१११३ - ११५०) याने जगप्रसिद्ध एंगकोर वट या भव्य देवळाची निर्मिती केली. भगवान विष्णूंचे हे मंदिर स्थापत्यशास्त्राचे जगातील एक आश्चर्य मानले जाते. हे देऊळ पूर्ण करण्यास ३७ वर्षे लागली व याकामी सुमारे ५०,००० मजूर राबले असा संदर्भ वाचनात येतो. या वंशातील इतर कलाप्रेमी राजांनीही अशा अनेक मंदीरांची निर्मिती केली.

कालांतराने या वंशातील राजांनी बौद्ध धर्म स्वीकारला. असं अनुमान काढलं जातं की बौद्ध धर्माच्या स्वीकारानंतर 'देवराजाची' प्रथा मोडीत निघाली व हळू हळू राज्य विस्तार, नियंत्रण या सर्वांना खीळ बसली. त्यातूनच पुढे हे साम्राज्य कमकुवत झाले.


मूळ संस्कृत श्लोकाचा अर्थ याहून वेगळा असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मिळालेल्या माहीतीवरून हा श्लोक उद्धृत केला आहे. तज्ज्ञांनी अधिक माहीती द्यावी. मी संस्कृत जाणकार नसल्याने श्लोक लिहीण्यात चूक झाली असेल तर चू. भू. दे. घे.

काही ठीकाणी या राजकन्येचे नाव सोमा असल्याचे वाचनात आले आहे.

एंगकोर वटचे मंदीर हा एक विस्तृत विषय असल्याने त्यावर एक स्वतंत्र लेख लिहावा लागेल. त्यामुळे अधिक माहीती दिलेली नाही.
वरील लेखासाठी वापरलेली माहीती महाजालावरील अनेक संकेतस्थळांवरून संकलित केली आहे आणि सर्व चित्रे विकिपिडीया मुक्तकोशाच्या सौजन्याने वापरली आहेत.

Wednesday, August 02, 2006

राजे सरफोजी आणि सरस्वती महाल ग्रंथालय

इजिप्त व मेसोपोटेमिया सारख्या ठिकाणी संस्कृतींचा (भाषा, लिपी वगैरे) उदय झाल्यावर माणसाला हळूहळू लिखित दस्तावैज तयार करण्याची गरज पडू लागली असा ज्ञात इतिहास आहे. पुरातत्त्ववेत्त्यांना हल्लीच सापडलेली ४०००(?) वर्षांपूर्वीची सुमेरियन मृत्तिका पट्टी ही लिखित दस्तावैजातील सर्वात प्राचीन पुरावा मानला जातो.

इजिप्त मध्ये नाईल काठी उगवणार्‍या पपायरस या झाडापासून बनवल्या जाणा-या कागदावर, मेसोपोटेमियात चिकण मातीच्या पट्ट्यांवर आणि भारतात बेतुल वृक्षापासून बनवल्या जाणा-या भूर्जपत्रांवर लिखाणाला सुरुवात झाली. या बरोबरच हे हस्तलिखित जपून ठेवण्याची आणि इतरांना व पुढच्या पिढीला उपलब्ध करून देण्याची गरज भासू लागली. ज्ञान संचयासाठी लागणा-या या गरजेमुळेच नंतरच्या काळात ग्रंथालयाची उत्पत्ती झाली असावी.

ग्रंथालयाचा सर्वात जुना उल्लेख ग्रीक इतिहासात सापडतो. त्याकाळी ग्रंथालये ही शासनकर्ते व अधिकारी विद्वानांची खाजगी मालमत्ता असून त्यात सर्वसामान्य जनतेला प्रवेश नसावा असे वाचनात आले आहे. ख्रि. पू. तिसऱ्या शतकात टोलेमी दुसरा याच्या काळातले ऍलेक्झांड्रीयाचे ग्रंथालय त्या काळी जगातले सर्वात भव्य ग्रंथालय म्हणून गणले जायचे. भारतातही नालंदा व तक्षशीला सारख्या विद्यापीठांमध्ये अशी ग्रंथालये होती. नालंदा विद्यापीठाचे ग्रंथालय ९ मजली असल्याचे वाचनात आले आहे. ही ग्रंथालये केवळ विद्यार्थी व सन्माननिय पाहुणे केवळ यांच्यासाठीच होती. दुर्दैवाने त्याबाबत अधिक माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. या नंतरच्या इतिहासातही ग्रंथालयांविषयी फार माहिती दिसत नाही.

त्यानंतर मध्ययुगीन कालातही अशी अनेक खाजगी ग्रंथालये असण्याचा संभव आहे. कलाप्रेमी राजे व संस्थानिक यांनी आपल्या खाजगी ग्रंथालयांची स्थापना केली होती. यातील एका महत्वाच्या आणि सध्याही अस्तित्वात असणा-या "सरस्वती महाल ग्रंथालयाची" माहिती हल्लीच माझ्या वाचनात आली. शिवाजी राजांच्या वंशातले राजे सरफोजी यांनी या ग्रंथालयाची स्थापना केली होती.

सरफोजी राजे (१७७७-१८३२): शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू एकोजी (व्यंकोजी) राजे यांच्यापासून आठव्या पिढीत सरफोजी राजांचा जन्म झाला. (ते दत्तक पुत्र असल्याचे वाचनात आले आहे) १७९८ साली ते तंजावूरच्या गादीवर आले. सरफोजी राजे हे कलासक्त, साहित्यप्रेमी आणि विद्येचे आदर करणारे होते. त्यांच्या राज्यकालात तंजावूरला विद्येच्या माहेरघराचा दर्जा प्राप्त झाला. वाचन आणि ज्ञानसंचयाच्या विलक्षण आवडीतून त्यांनी सरस्वती महाल ग्रंथालयाची स्थापना केली. या ग्रंथालयासाठी त्यांनी परदेशातून विविध विषयांवरची सुमारे ४००० पुस्तके/ ग्रंथ खरेदी केली. अस म्हटलं जात की ही पुस्तके/ ग्रंथ त्यांनी स्वत: वाचले होते. या ग्रंथालयात नाट्यशास्त्र, नृत्यशास्त्र, स्थापत्यशास्त्र, वैद्यकशास्त्र, हत्ती-घोडे यांचे प्रशिक्षण, वेदान्त, ज्योतिष, व्याकरण, संगीत अशा अनेक विषयांवरील ग्रंथ आढळतात.

सरफोजी राजांनी दक्षिणेत पहिला देवनागरी छापखाना टाकला. त्यात छपाईसाठी दगडाक्षरांचा वापर करण्यात आला. तसेच त्यांनी वैद्यक शास्त्रातील प्रगती करता धन्वंतरी महाल प्रयोगशाळेची स्थापना केली. यात ऍलोपथी, आयुर्वेद, युनानी, सिद्ध वैद्यांकडून संशोधन चालत असे. या प्रयोगशाळेत अनेक औषधी वनस्पतींचा अभ्यास करून त्यांची खुलासेवार वर्गवारी करण्यात आली. त्यांना चित्रकलेतही विशेष रस होता हे त्यांच्या दरबारातील तैलचित्रांवरून जाणवून येई. त्यांच्याकडे पुरातन दुर्मिळ नाण्यांचा संग्रह ही होता.

सरफोजी महाराजांच्या मृत्यूनंतर ब्रिटिश सरकारने तंजावूरचे राज्य खालसा केले.

सरस्वती महाल ग्रंथालय: हे ग्रंथालय संपूर्ण जगात; मध्ययुगीन काळातील एक महत्त्वपूर्ण ग्रंथालय मानले जाते. या ग्रंथालयात सुमारे ४६००० हस्तलिखिते संग्रहित केलेली आहेत. त्यातील काही प्राचीन असून भूर्जपत्रांवर व ताडपत्रांवर लिहिलेली आहेत. त्यात मध्ययुगीन काळातील वाल्मीकी रामायण, कंब रामायण व इतर पुरातन ग्रंथांच्या ताडपत्रावरील प्रती आहेत. कागदांवर लिहिलेल्या हस्तलिखितांमध्ये इसवी सन १४६८ मध्ये लिहिलेले भामती, भगवद्गीतेचे सर्वात लहान आकारातील हस्तलिखित, अंबर होसैनी या मुसलमान कवीने केलेले भगवद्गीतेचे मराठी निवेदनाचे हस्तलिखित, तत्त्व चिंतामणी हा बंगाली लिपीतील संस्कृत ग्रंथ यांचा समावेश आहे.

मराठी हस्तलिखिते: इसवी सन १६७६ ते १८५५ च्या मराठा राज्यकाळात लिहिली गेलेली मराठी हस्तलिखिते या ग्रंथालयात जतन केलेली आहेत. त्यांची संख्या अदमासे १८५६ आहे. यात संतकवी रामदासी व दत्तात्रय मठातील विपुल साहित्य आहे. पुढे जेव्हा हे ग्रंथालय सर्वसामान्य जनतेसाठी खुले केले गेले त्यावेळेस अनेक मराठी पंडित व विद्वानांनी लिहिलेल्या १२२० हस्तलिखितांची या संग्रहात भर घातली गेली. आता त्यांची संख्या ३०७६ इतकी आहे.

यातील बरेचसे साहित्य महाराष्ट्रात उपलब्ध नसल्याने त्याला दुर्मिळतेचे एक वेगळेच महत्त्व प्राप्त आहे. माधव स्वामींचे रामायण, महाभारत, मेरू स्वामीचे अवधूत गीता टीका व रामसोहळा, मुकुंद स्वामींचे श्री रामकृपा विलास, राघव स्वामीचे आत्मबोध, आणि अनंत मुनी यांची भगवद् गीता यांचा या दुर्मिळ हस्तलिखितांत समावेश आहे.

याखेरीज तामीळ, संस्कृत, उर्दू हस्तलिखितांचाही या ग्रंथालयात समावेश आहे. मोडी लिपीतील राज्यकारभार विषयक दैनंदिनी, हिशेब, टिप्पणी, पत्र व्यवहार या सारखी लिखितेही या ग्रंथालयात जतन केलेली आहेत. याखेरीज मराठी भाषेतील आणि मोडी लिपीत लिहिलेल्या चार प्राचीन ताम्रपट्टीका या ग्रंथालयात दर्शनी ठेवलेल्या आहेत. तसेच अनेक प्राचीन नकाशांचाही संग्रह केलेला आहे.

सध्या हे ग्रंथालय सर्वसामान्य जनतेसाठी खुले असून त्यातील संग्रहाचा संदर्भकोश म्हणून वापर करता येतो.

Monday, June 19, 2006

रेव्ह. चार्ली एन्ड्रूज

काल परवा रिचर्ड ऍटेनबरोंचा गांधी चित्रपट पुनश्च पाहिला. नक्की कितव्यांदा ते आठवत नाही पण दरवेळेला चित्रपट पाहताना एक प्रश्न नेहमीच पडायचा. संपूर्ण चित्रपटात गांधिजींना "मोहन" म्हणून हाक मारणारे आणि त्यांना भारतात परत आणण्यात काही अंशी कारणीभूत असलेले "रेव्ह. चार्ली एन्ड्रूज" हे महाशय नक्की कोण?

एखाद्या अपरिचित व्यक्तीची माहिती काढणे हे तसेही थोडे कठिण काम. त्यातून ती व्यक्ती विस्मृतीत गेलेली, माझ्याकडेही माहितीच्या महाजाला शिवाय दुसरे साधन नाही. पण महाजाला सारखं दुसरं प्रभावी साधन नाही असंही म्हणता येईल कारण प्रथमदर्शनी कठीण वाटणारा हा शोध अगदी सोपा झाला. सर्वप्रथम IMDB (Internet Movie Data Base) वर गांधी चित्रपट शोधला. त्यात रेव्ह. चार्ली एन्ड्रूज हे नाव दृष्टीस पडले त्यामुळे गुगलवर त्यांचा शोध घेणे खूप सोपे झाले. वाचलेल्या माहितीवरुन पुढील गोषवारा लिहीत आहे.

रेव्ह. चार्ल्स फ्रिर (चार्ली) एन्ड्रूज यांचा जन्म १८७१ साली न्यू कॅसल, इंग्लंड येथे झाला. चार्लींचे वडिल ही चर्च मिनीस्टर होते, त्यांनी लहानग्या चार्लीला दोन महत्त्वाच्या गोष्टी शिकवल्या. पहिली, प्रार्थनेवर प्रेम आणि दुसरी गरीबांवर प्रेम. काही कौटुंबिक कारणांमुळे चार्लीचे कुटुंब गरीबीच्या खाईत लोटले गेले. चार्लीच्या आई वडिलांना कुटुंब चालवण्यासाठी जे अपार कष्ट घ्यावे लागले त्याचा लहानग्या चार्लीच्या मनावर खोल परिणाम झाला.

ख्रिस्ती धर्माचे शिक्षण घेऊन १८९७ साली चार्ली पाद्री बनले. याच काळात त्यांचा ब्रिटिश साम्राज्या विरुद्ध होणाऱ्या अन्यायाच्या झगडयाशी संबंध आला आणि त्यातल्या त्यात भारतात सुरु असलेल्या लढयाविषयी त्यांना विशेष आत्मीयता वाटली. १९०४ साली दिल्ली येथिल से. स्टिफन कॉलेजमधे शिकवण्याची संधी चालून आली आणि पडत्या फळाची आज्ञा घेऊन चार्ली भारतात दाखल झाले.

भारतात ब्रिटिशांचे वर्णद्वेषी धोरण पाहून ते व्यथित झाले आणि स्वत: या लढयात सक्रिय व्हायचे त्यांनी ठरवले. लढयाला पाठिंबा देणारा ब्रिटिश पाद्री या नात्याने त्यांना भारतात एक आगळेच महत्त्व प्राप्त झाले. नॅशनल कॉंग्रेसच्या सभा व बैठकींना त्यांना आमंत्रित केले जाऊ लागले. पाद्री असल्याने त्यांनी ब्रिटिश व भारतीय या दोहोंचा विश्वास लवकरच संपादन केला. यानंतर चार्ली स्वत: लढयात सक्रिय झाले.

१९१३ साली कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते गोपाळकृष्ण गोखले यांच्या आग्रहावरुन चार्ली साऊथ अफ्रिकेच्या भारतीय समाजाला वर्णद्वेषाविरुद्ध त्यांच्या लढयात मदत करण्यासाठी तिथे दाखल झाले. तेथिल वास्तव्यात त्यांची भेट गांधीजींशी झाली आणि गांधीजींच्या अहिंसेच्या आगळ्या वेगळ्या संकल्पनेने ते प्रभावित होऊन गेले. या दोघांतील अतूट मैत्रीला इथूनच सुरुवात झाली.

१९१६ साली चार्ली गांधींजींसमवेत भारतात परतले. चंपारण्याच्या सत्याग्रहाच्या कैदेत असताना गांधीजींनी त्यांना "फीजी" ला जाऊन तेथिल मजूर आणि कामगारांना आपल्या हक्कांविषयी जागृत करण्यास सुचवले. त्यानुसार चार्ली फिजीला गेले. फीजीला त्यांना "दीनबंधू " या विशेषणाने सन्मानित करण्यात आले.तिथून परतल्यावर १९२५ व १९२७ साली त्यांनी All India Trade Union चे अध्यक्षपद भूषवले. १९३१ साली गोल मेज परिषदेसाठी गांधीजींसमवेत ते ईंग्लंडला जाऊन आले.

सर्व धर्मांविषयी त्यांचा दृष्टीकोन सहिष्णू तर होताच पण अस्पृश्यता निर्मूलनाच्या चळवळीतही त्यांचा सक्रिय सहभाग होता. १९३३ साली त्यांनी बाबा साहेब आंबेडकरांना अस्पृश्यांच्या मागण्या अधोलिखित करण्यास मदतही केली. गुरुदेव टागोरांच्या शांतिनिकेतन मधे वेळ घालवण्यास त्यांना फार आवडायचे.

पुढे, भारताविषयी सहानुभूती बाळगणाऱ्या ब्रिटिशांनी इंग्लंडला परतावे व स्वातंत्र्यलढा भारतीयांनाच लढू द्यावा असे गांधीजींनी चार्लींना सुचवले. त्या नुसार त्यांनी आपल्या आयुष्याचा उर्वरित काळ ब्रिटनमधे व्यतित केला. तिथेही त्यांनी आपल्या लिखाणातून पाश्चिमात्य जगताला भारतीय स्वातंत्र्य लढा व गांधीजींच्या तत्वांची ओळख करुन दिली.

गांधीजींना "मोहन" या त्यांच्या प्रथम नावाने संबोधणारे चार्ली हे एकच असावेत. “Mahatma Gandhi: His Life and Ideas” हे पुस्तक त्यांनी लिहून प्रकाशित केले होते. ५ एप्रिल १९४० साली कलकत्ता भेटीवर असताना त्यांचे निधन झाले.

----------

आपल्या देशाच्या स्वातंत्र्यलढयाला येन केन प्रकारे मदतीचा हातभार लावणाऱ्या अनेक मोहोऱ्यांविषयी आपण अनभिज्ञ असल्याचे वारंवार लक्षात येते. या छोटयाश्या गोषवाऱ्यातून वाचकांचे लक्ष वेधण्याचा हा एक लहानसा प्रयत्न.

Thursday, May 04, 2006

विखुरलेले मोती

काहीतरी वाचताना भा. रा. तांब्याच्या प्रसिद्ध कवितेच्या ओळी नेहमीच आठवून जातात --
सूर्य तळपतील, चंद्र झळकतील,
तारे अपुला क्रम आचरतील
असेच वारे पुढे वाहतील, होईल का काही अंतराय?

जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहिल कार्य काय?

काळाच्या ओघात अनेक मौल्यवान रत्ने कुठेतरी हरवून गेली आहेत. तांब्यांनी कवितेत म्हटल्याप्रमाणे त्यांची आठवण होणे सुद्धा अभावानेच आहे. कधी त्या रत्नांना हवी तशी प्रसिद्धी मिळाली नाही म्हणून तर कधी समाजाला त्यांची फारशी गरज वाटली नाही. युद्धात वीरमरण पत्करणारा प्रत्येक योद्धा, राज्याश्रय न मिळालेले अनेक विद्वान, प्रासादाच्या पायाशी रचलेला दगड यांची गणती ठेवायची तरी कशी? या रत्नांबद्दल कधी कुठेतरी काही वाचायला मिळाल की मला उगीचच खंत वाटत रहाते.

या रत्नांबद्दलची माहिती संकलीत करुन ठेवावी अस बऱ्याच वर्षांपासून मनात आहे. त्यांची मी कशी पारख केली, मला ती किती आणि का भावली, त्यांचा हार कसा गुंफत जायचा ते या नवीन ब्लॉग द्वारे माझ्या शब्दांत मांडायच ठरवल आहे. यातली काही रत्न ऐतिहासिक आहेत तर काही पौराणिक, काही खरी तर काही रचवलेली, काही अस्सल भारतीय तर काहींचा दूरान्वये भारताशी संबंध नाही. बाकी त्यांच्याविषयीची माहिती मला जपून ठेवण्याची फार इच्छा आहे. "मनात आलं.."ची सुरुवात देवापासून केली होती. या ब्लॉगची सुरुवात "आई"ने करावीशी वाटते.

चांगली मुलं घडायला चांगले पालक कारणीभूत असतात. माझ्या सुदैवाने मला ते लाभले आणि मला वाटत की तुम्हालाही लाभले असतीलच. त्यातूनही, आई जर खंबीर, धोरणी, कर्तबगार आणि द्रष्टी असेल तर तिच्या पोटी नक्कीच "शिवाजी" जन्माला येतात. या ब्लॉगची सुरुवात करण्यासाठी जिजाबाईंपेक्षा अधिक महत्वपूर्ण व्यक्ति कोण मिळणार?

आपल्या मराठीत म्हण आहे, "स्वामी तिन्ही जगाचा आईविणा भिकारी." शिवाजी महाराज खरोखर भाग्यवान म्हणायला पाहिजेत कारण त्यांना आयुष्यात बराच काळ आपल्या कर्तबगार आईची साथ लाभली.

जिजाबाई हा कालौघात हरवलेला मोती नाही पण मला वाटत की या मोत्याला हवे तसे कोंदण लाभलेले नाही. विशेषत: माहितीच्या या महाजालावर त्यांच्याविषयी फार कमी माहिती उपलब्ध आहे.

४०० वर्षांपूर्वीच्या या स्त्रीचा द्रष्टेपणा आणि दूरदृष्टी ही खचितच वाखाणण्याजोगी आहे. जिजाबाईंचा माहेरचा आधार तुटलेला होता, पतीप्रेमही फारसे त्यांच्या वाटयाला नव्हते. पतीचा दुसरा घरोबा, मोठा मुलगा दुरावलेला, पुण्यासारखी उजाड जहागीर नशीबी आलेली. अशा परिस्थितीतही ज्याच्यावर आपल्या सर्व आशा केंद्रीत आहेत त्या मुलाचे, स्वराज्याचे दुर्गम स्वप्न साकार व्हावे यासाठी अखंड त्याच्या पाठीशी उभं राहून त्याच्या या कार्यात सहभागी होणारी आई इतिहासात विरळाच.

काही दिवसांपूर्वी विकिपिडियाच्या मराठी ज्ञानकोशाच्या आवृत्तीवर काहीतरी शोधताना एक टीपण्णी वाचली की तेथील लेखांची संख्या केवळ साडे ३००० आहे. सहज म्हणून शिवाजी महाराजांविषयि माहिती शोधली तर बऱ्यापैकी लेख होता पण जिजाबाई, शहाजीराजे आणि इतर अनेक संलग्न व्यक्तींविषयी काहीच माहिती नव्हती. होत्या फक्त माहितीअभावी असलेल्या लाल खुणा. पाहून मनाला बरं नाही वाटलं. आपल्यामधे उत्कृष्ट मराठी लिहिणारे अनेकजण आहेत. त्यापैकी काही जणांनी तरी आपल्याकडिल माहिती या ज्ञानकोशात घातली तर तेथील उपयुक्त लेखांची संख्या वाढेल.

मी इतिहास विषयाची तज्ञ मुळीच नाही, तरीही मला जिजाबाईंविषयी ज्ञात असलेली ऐतिहासिक माहिती मी तिथे भरली. आपल्याला या पेक्षा जास्त माहिती असल्यास जरुर फेरफार करा. एके ठिकाणी जिजाबाईंविषयी बऱ्यापैकी माहिती मिळून गेली, पण त्यात आख्यायिका अधिक वाटतात. दोन्ही लिंक पुढे दिल्या आहेत.
या पुढील लेखही अशाच एका आईबद्दल लिहिण्याचा विचार आहे. ही आई भारतातील नाही पण तिचा अद्वितीय पराक्रमी पुत्र भारताशी जोडलेला आहे. जिजाबाईंसारखीच तीही दूरदर्शी आणि धोरणी होती. पण इतिहासकारांनी तिच्या कर्तुत्वाला काळी झालर जोडली आहे.