Thursday, April 26, 2007

आर्य भारतात बाहेरून आले का?

उपक्रम या संकेतस्थळावरील एका चर्चेला प्रतिसाद देताना खालील प्रतिसाद लिहीला होता. त्याचा एक लहानसा लेख बनतो आहे असे वाटल्याने तो येथे टंकत आहे. खालील विचार माझे नसून मी नुकत्याच वाचत असलेल्या पुस्तकातील आहेत. लेखाच्या शेवटी पुस्तकाची माहिती दिली आहे. (या लेखातून कोणतेही वाद निर्माण करायची इच्छा नाही.)

आर्य भारतात बाहेरून आले का? या मुख्य मुद्द्यावर येण्यापूर्वी या प्रकाराची थोडीशी पार्श्वभूमी. जो समाज शहरे वसवतो तो इतर समाजापेक्षा अधिक सुसंसकृत गणला जातो हे त्रिकालाबाधित सत्य आहे. येथे झपाट्याने अमर्याद फोफावलेल्या मुंबईसारख्या शहरीकरणाचा विचार करू नये. हे वाक्य का आले त्याचा उहापोह खाली केला आहे.


जगाच्या इतिहासात सर्वप्रथम शहरे वसवण्याचा मान मेसोपोटेमिया, इजिप्त आणि भारताकडे जातो. या तीनही संस्कृतींत इ.स. पूर्व ४००० ते ३००० च्या दरम्यान शहरांची निर्मिती करण्यात आली. भारतात हडप्पा, मोहेंजेदाडो, लोथल, ढोलवीरा अशी सुमारे २६०० पुरातन शहरांची ठिकाणे आढळतात. भारतातील या संस्कृतीला सिंधू संस्कृती म्हटले जाते, परंतु नवीन संशोधनाप्रमाणे ते पूर्ण सत्य नाही. वेदांत आणि इतर पुराणांत वर्णिलेली सरस्वती नदी जी या प्रदेशातून वाहत होती, ती या काळात सुकलेली नव्हती त्यामुळे हल्ली या संस्कृतीला सिंधू-सरस्वती संस्कृती असेही म्हटले जाते.

मॅक्स म्युल्लरने ऋग्वेदाचा काळ इ.स.पूर्व १५००-१२०० असा ठरवला परंतु त्यासोबत त्याने एक महत्त्वाची टिप्पणी केली - वेदांचा निश्चित काळ तो इ.स.पूर्व १०००-२००० की ३००० हे सांगणे पृथ्वीवर कोणालाही शक्य नाही. याचा एक अर्थ असाही घेता येईल की आर्यांनी वेदांची रचना केली असे सिद्ध होत नाही कारण इ.स. पूर्व २०००-३००० दरम्यान आर्य भारतात आलेच नव्हते. आर्य या नावाची व्युत्पत्ती अधिक खोलात जाऊन सांगायची गरज वाटत नाही. तत्कालिन पाश्चात्य संशोधकांनी ज्याला आर्य समाज हे नाव दिले ते वेदांत वर्णिलेल्या सुसंस्कृत पुरुषांना दिलेले संबोधन आहे इतकेच. म्युल्लरने आर्य भारतात आल्याचा काळही इ.स. पूर्वी १५०० वर्षांचा ठरवला. युरोपातून आलेल्या गोर्‍या लोकांच्याभटक्या जमातींनी एतद्देशीय समाजाला बळाच्या जोरावर हुसकावून दक्षिणेत जाण्यास भाग पाडले. आर्यांनी आपल्या सोबत जो सांस्कृतिक वारसा आणला तो संपन्न भाषेचा आणि त्यांनी भारतीय लोकांना सुसंकृत बनवले असे गृहितक मांडले गेले. या गृहितकावर, 'गोर्‍यांचे अबाधित वर्चस्व स्थापन करण्याच्या उद्देशाने' असा मलिन इतिहास लिहीला गेल्याचा ठपका लागतो.

आता जर मूळ मुद्दा पाहिला तर पहिले गृहितक युरोपीय वंशाच्या सुसंस्कृत लोकांनी भारतावर स्वारी करून तेथिल द्रविड लोकांना दक्षिणेत जाण्यास भाग पाडले असे ठरते. या गृहितकाला धक्का लागला तो हडप्पा आणि मोंहिजेदाडोच्या खोदकामानंतर. या शहरांचे बांधकाम आर्य येण्याच्या फार पूर्वीचे असल्याने तेथे सुसंकृत संस्कृती नांदत नव्हती या कल्पनेला तडा जातो कारण या शहरांचे बांधकाम, त्यातील विटांचा वापर, जलनि:सारण पद्धत, मूर्ती, खेळणी, शिक्के, भांडी पाहिली असता एका शहरे वसवून राहणार्‍या सुसंस्कृत समाजाला केवळ बळाच्या जोरावर घोड्यावर बसून आलेल्या भटक्या आर्यांनी पळवून लावले असे दुसरे गृहितक मांडले गेले. (या शहरांत कोणताही लिखित ठेवा का सापडत नाही त्याच्या शक्यतेबद्दल वेगळा लेख लिहीता येईल.) या गृहितकाने आर्यांचा बाहेरुन येऊन सुसंस्कृत संस्कृती भारतीय समाजाला देण्याचा दावा खोटा ठरवला जातो.

परंतु, पुढे हे ही गृहितक खोटे ठरते कारण या खोदकाम झालेल्या ठिकाणांत कोठेही युद्ध झाल्याचे, नासधूस, जाळपोळ, शहर बेचिराख झाल्याचे पुरावे सापडत नाहीत. इतकेच काय परंतु मिळालेल्या मानवी सांगाड्यांवरूनही त्यांचे मृत्यू लढाईत वार होऊन किंवा अपघातात झाले असे आढळून येत नाही. (असे काही सांगाडे आढळले तरी ते एका प्रसंगात आणि एका ठिकाणी आढळले नसल्याने या ठीकाणी युद्ध झाले अशी कोणतीही खूण मिळत नाही.)

भारतीय पुरातत्त्व खात्यानुसार लोथल शहराचे रूप



१९९९ ला डॉ. एस्. आर्. राव, ग्रेगरी पोसेल आणि इतर भारतीय आणि अभारतीय तज्ज्ञांनी असे गृहितक मांडले की आर्य नावाचा कोणताही वंश नाही, आर्य नावाची इंडो-युरोपीय भाषासमूहातील भाषा बोलणारी कोणतीही जमात भारतावर स्वारी करून आली नाही.

येथे काही इतर तज्ज्ञांचे मत असेही पडते की युरोप आणि मध्य आशियातून टोळ्या आल्या नाहीत असे नाही परंतु त्याचा काल फार पूर्वीचा असावा (अश्मयुगीन), ती घुसखोरी किंवा स्वारी नाही.

डॉ. आर्.एस्. बिश्त (भारतीय पुरातत्त्वखात्यातील एक संचालक) मते ऋग्वेदात वर्णन केलेली शहरे म्हणजेच सिंधू-सरस्वतीच्या खोर्‍यातील शहरे आहेत. या शहरांत गाई-गुरे आणि घोडे पाळल्याचे, यज्ञकर्म केल्याचे, तसेच या शहरांतून समुद्रप्रवास आणि व्यापार चालत असल्याचे पुरावे मिळतात. सरस्वती नदी सुकल्याने या शहरांतील लोकांनी स्थलांतर केले असेही एक गृहितक मांडले जाते.

हे आणि असे बरेचसे विचार ग्रॅहम हॅनकॉक यांच्या 'अंडरवर्ल्ड - द मिस्टेरिअस ओरिजिन्स ऑफ सिविलायझेशन' या पुस्तकांत मांडलेले आहेत. ग्रॅहम हॅनकॉक पुरातत्त्ववेत्ता नाही केवळ पत्रकार आहे. त्यांच्या बर्‍याचशा शक्यता खर्‍या असतील असे नाही परंतु ते बर्‍याचशा शक्यता स्वतः मांडण्यापेक्षा विषयांतील तज्ज्ञांचे विचार मांडतात त्यामुळे पुस्तक वाचनीय ठरते.

मोहेंजेदाडोचे एक चित्र येथे लावले आहे. त्याकडे लक्षपूर्वक पाहिले असता त्यातील सारखेपणा लक्षात येईल. उत्खनन केलेले हे शहर अतिशय मोनोटोनस दिसते. ज्यांना इतिहास आणि पुरातत्त्वशास्त्रात काहीही रस नाही ते हे स्थळ पाहून कंटाळून जातात असे वाचले आहे. (येथे अमेरिकेतील एखादा हायवे किंवा टाऊनशिप नजरेसमोर आणा. हायवेवरून तासन् तास गाडी हाकणारा माणूस कंटाळतो परंतु त्याच बरोबर हे हायवे बांधणार्‍यांची दूरदृष्टी आणि अभियांत्रिकी वाखाणण्याजोगी आहे. त्यांचे आकार, वेगमर्यादा, रॅम्प्स्, आत-बाहेर करण्याच्या सुविधा, रस्त्यांवरील चिन्हे, माहिती, रस्त्यांच्या कडेला असणारे शोल्डर्स् वगैरे वगैरे) मोहेंजेदाडो शहरातील जलनि:सारण पद्धत, रस्त्यांचे बांधकाम, भाजलेल्या, सुकवलेल्या विटा आणि लाकडे यांची बांधकामे आणि त्यातील सारखेपणा हे सुसंस्कृतीचे लक्षण आहे कारण हे सर्व बांधकाम करण्यासाठी गणित, खगोलशास्त्र, भूमिती, यांत्रिकी अशा अनेक शाखांची खोलवर माहिती हवी.

यावर वर उल्लेखलेल्या पुस्तकातील एक उदाहरण देते.

ढोलवीरा या शहराची रचना अप्पर टाऊनशिप, मिडल टाऊनशिप आणि लोअर टाऊनशिप (परम्, मध्यम् आणि अवम्) अशा तर्‍हेची आहे. यातील एका स्थळाचे मोजमाप पुढील प्रमाणे - पूर्वेकडून पश्चिमेकडील लांबी ७७१ मीटर आणि उत्तरेकडून दक्षिणेची लांबी (किंवा रुंदी म्हणू) ६१६.८ यांतील अप्पर टाऊनशिपचा भाग पूर्व-पश्चिम ११४ मीटर आणि उत्तर-दक्षिण ९२.५ मीटर. दोन्हींचे गुणोत्तर येते ५:४. (इतकी अचूकता नक्कीच वाखाणण्याजोगी आहे.) परंतु हेच परिमाण का याचे स्पष्टीकरण बिश्त आणि एक प्राध्यापक एस्.पी गुप्ता यांनी पुढीलप्रमाणे दिले आहे.

त्यांच्यामते हा योगायोग नाही. ऋग्वेद आणि इतर काही पुराणांत यज्ञवेदीच्या लांबी रुंदीविषयी लिहीले आहे.** त्याचे गुणोत्तर ५:४ असे आहे. (यावरूनही आर्यांनी वेदांची रचना केली नाही असा एक निष्कर्ष निघतो.) म्हणजेच जो समाज शहरे बांधू शकतो तो रानटी नाही, ज्यांना ही शहरे बांधायचे ज्ञान होते त्यांना इतर अनेक शाखांतील ज्ञानही नक्कीच होते.

** यज्ञवेदीचे अनेक प्रकार आहेत आणि त्यांची योग्य परिमाणे ऋग्वेदात (किंवा इतर प्राचीन पुराणांत) दिलेली आहेत अशा प्रकारचा सुभाष काक यांचा एक लेख वाचलेला आठवतो. त्यापैकी नक्की कोणती यज्ञवेदी याची मात्र कल्पना नाही.


येथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे भगवान विष्णू,शंकर, राम, कृष्ण, द्रौपदी, दमयंती यासारखी पुराणांतील अनेक प्रमुख पात्रे श्यामलवर्णी आहेत. कोणत्याही अंगाने गोरी नाहीत.

वरील प्रतिसाद मला पुस्तकातील हा भाग जसा समजला त्यावरून आणि काही इतर वाचनांवरुन (जो येथे अत्यल्प आहे.) थोडक्यात देण्याचा प्रयत्न केला आहे. वरील चर्चेत उल्लेखलेल्या मुद्द्यांना केवळ स्पर्श करण्याचा प्रयत्न केला आहे. मूळ विषयाची व्याप्ती प्रचंड आहे आणि या लेखात त्रुटी आढळल्यास चू. भू. द्या. घ्या.

सर्व चित्रे विकिपिडियावरून.

6 comments:

A woman from India said...

Amazing article.
Keep writing

Vidya Bhutkar said...

Too good article. It made me curious abt the book you mentioned here..'Underworld...'. I'll try to get that to read. Once again, great article, very informative and well put.
-Vidya.

HAREKRISHNAJI said...

आपल्या अभ्यासाची व कठीण विषय समजवुन देण्याच्या कौश्यल्याची दाद द्यायला हवी. माझ्या वाचनात आले होते ही द्रविड हा शब्द ब्रिटीशानी दिला. त्या आधी दक्षिणेकडॆ रहाण्याऱ्ना द्रविड म्हणत नह्ते

आपण ईरावती कर्वेंचे युगान्त हे पुस्तक वाचले आहेत काय ?

HAREKRISHNAJI said...

my letter has been publised in today's Loksatta. Could you please read it.
http://www.loksatta.com/daily/20070430/emanas.htm

.. said...
This comment has been removed by the author.
.. said...
This comment has been removed by the author.